शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान सभा
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान सभा 
मुख्य बातम्या

शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान सभा

टीम अॅग्रोवन

अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग मार्च व राजस्थानमधील भव्य महापडाव यशस्वी केल्यानंतर किसान सभेने आता शेतकरी प्रश्नांसाठी देशव्यापी लढ्याची तयारी सुरू केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची बैठक दिल्ली येथे संपन्न झाली. देशभरात दहा कोटी सह्या गोळा करून लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत किसन गुजर व डॉ. अजित नवले यांच्यासह देशभरातील २५ राज्यांतील शेतकरी नेते उपस्थित होते. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे या राज्यांत शेतकऱ्यांची अंशतः कर्जमाफी करण्यात आली आहे; मात्र येथील शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी करत आहे. देशभरातील उर्वरित राज्यांमधील शेतकरीही कर्जाने त्रस्त असल्याने देशभरातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज केंद्र व राज्य सरकारांनी माफ करण्याची मागणी समोर येत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी हस्तक्षेपामुळे शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतीमालाला दीडपट भावाची कायदेशीर हमी देण्याची मागणी या पार्श्वभूमीवर शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी किसान सभेने राज्य व केंद्र सरकार विरोधातील संघर्ष लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.  शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी करा, शेतीमालाला दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या या राज्य व केंद्र सरकारशी संबंधित प्रमुख मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात येत आहे. लढ्याला शेतकऱ्यांचे व्यापक समर्थन मिळावे, यासाठी शेतकऱ्यांच्या दहा कोटी सह्या गोळा करण्याची मोहीम किसान सभेने हाती घेतली आहे. मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या दहा कोटी सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन लढ्याची सुरवात करण्यात येणार आहे.  केंद्रीय किसान कमिटीने केलेल्या या आवाहनाची महाराष्ट्रात गांभीर्याने अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशव्यापी सह्यांची मोहीम, लाँग मार्चने लढून मिळविलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व उर्वरित मागण्यांसाठी करावयाच्या लढ्याचे नियोजन करण्यासाठी किसान सभेच्या राज्य कौन्सिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.  दिनांक ८ व ९ एप्रिल रोजी कॉ. बी. टी. रणदिवे स्मारक भवन, बेलापूर येथे ही बैठक होणार आहे. किसान सभेचे सर्व राज्य कौन्सिल सदस्य या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील २७ जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. लाँग मार्चने लढून मिळविलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीवर या वेळी अधिक भर देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT