पुणे : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने खरिपातील पिके होत्याची नव्हती झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले. पण, जिल्ह्याकरिता ज्या विमा कंपनीची पीकविम्यासाठी नेमणूक केली आहे. त्या कंपनीकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने कृषी, महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याच्या अहवालानुसारच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती मिळाली.
यंदा २०१९-२० मध्ये खरिपात नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील ४१ हजार १३९ शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. विम्यापोटी २७ हजार ८४७ हेक्टर क्षेत्राला संरक्षण मिळाले असून नुकसान झाल्यानंतर कंपनीकडून ७७ कोटी २६ लाख २६ हजार रुपयांची रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
अतिवृष्टीने सोयाबीन, बटाटा, तूर, मूग, भात अशा प्रमुख पिकांसह खरिपातील इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीबाबात पंचनामे करण्यात आले आहेत. तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक व निवडक ठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधींसोबत हे पंचनामे करण्यात आले आहेत. यातून सादर झालेल्या अहवालात सुमारे सव्वा लाखांहून अधिक क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी नुकतीच मदत जाहीर केली आहे. यात जिरायती पिकांना प्रतिहेक्टरी आठ हजारांची मदत दोन हेक्टरची मर्यादा ठेवत जाहीर केली. बागायती पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन, भात, बटाटा पिकांचे नुकसान झाले. जिरायती भागातही नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले असले तरी अजून विमा कंपनीने मात्र, विमा रक्कम देण्यासाठी ठोस हालचाली सुरू न केल्याचे दिसून येते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.