सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचे तीव्र पडसाद
सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद जाहीर केला, पण आषाढी एकादशीच्या वारीमुळे अद्यापही वारकरी पंढरपुरात आहेत. वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी पंढरपुरात आलेला वारकरी त्याच्या घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चान घेतला, त्यानुसार सोलापूर शहरात सर्वत्र शांतता आणि सुरळीत व्यवहार सुरू राहिले, पण राज्यातील अन्य घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पडसाद उमटलेच. पंढरपुरात वाहतूक सुरळीत राहिली, त्यामुळे वारकरी परतीच्या मार्गावर निघाले आहेत, पण मोहोळ, करमाळा, माळशिरस, सांगोल्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी उपोषण, ठिय्या आंदोलन झाले. जिल्ह्यातील बहुतेक सर्व शाळा बंद राहिल्या.
मराठा समाजातील कार्यकर्ते बाजारपेठेमध्ये, मार्केट यार्डमध्ये फिरून सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद नसल्याचे सांगत आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही समाजाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, चार हुतात्मा पुतळ्यांसमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
बंद शाळा सुरू ठेवण्याचेही आवाहन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील शाळा सुरू आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील बाजारपेठा चालू ठेवण्यासंदर्भात कार्यकर्ते स्वतः जाऊन सांगत होते. त्यामुळे शहरात काहीसे सुरळीत वातावरण होते, पण जिल्ह्यात मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. सकाळपासून जिल्ह्यात मोहोळ, मोडनिंबला बाजारपेठा बंद राहिल्या. वैराग, कुर्डुवाडीतही बंद पाळण्यात आला. त्याशिवाय माढा, श्रीपूरमध्ये उपोषण करण्यात आले. सांगोल्यातही सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. करमाळ्यात एसटी स्थानकाच्या बाहेर टायर जाळण्यात आले. पिंपळनेरमध्येही रस्त्यावर पेटते टायर टाकण्यात आले. मंगळवेढ्यातील भोसेमध्ये रस्त्यावर लाकडाची ओंडके टाकून रास्ता-रोको करण्यात आला.