पुणे कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण
पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत उभे करावे लागणार आहे. त्यासाठी शासकीय विभागांचे पूरक व्यवसायांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाने पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम बुधवारी (ता.१८) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. बापट बोलत होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय सहनिंबधक दीपक तावरे, सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, की शेतकरी हा घटक मानून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाऊस आला तरी नाही आला तरी शेतकऱ्यांना नियोजन करावे लागते. पूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज, पाणी अशा सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
याशिवाय गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजना राबवली. त्याचा मोठा फायदा झाला असून टॅंकरची संख्या कमी झाली आहे. दरवर्षी टॅंकरवर सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च होत होते. परंतु, यंदा ‘जलयुक्त शिवार’मुळे टॅंकरवर फक्त ५१ टक्के खर्च झाला आहे. ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण असे प्रश्न आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजनेतून लाभ दिला जात आहे.
विभागीय आयुक्त दळवी म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. दाखल अर्जांची ऑनलाईन छाननी करून दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम देण्यात येत आहे. या कर्जमाफीमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची मला खात्री आहे. येत्या १५ नोव्हेंबरपूर्वी कर्जमाफीची रक्कम दिली जाईल.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील २५ हून जास्त शेतकरी कुटुंबीयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातून आमदार बाबूराव पाचर्णे आणि शहरातून आमदार जगदीश मुळीक वगळता एकही आमदार या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी या आमदारांना किती गांभीर्य आहे याची चर्चा दबक्या आवाजात सभागृहात सुरू होती. जिल्ह्यात आणि शहर मिळून एकूण २१ आमदार आहेत. त्यापैकी फक्त दोन आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील एकही खासदार कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते.