पुणे ः डोंगराळ व पर्वतीय विभागांमध्येच अळिंबी व विशेषतः बटन अळिंबीचे उत्पादन होऊ शकते, हा समज दूर करण्यात राज्यातील अळिंबी उत्पादकांचे श्रेय अधिक आहे. अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी असून हे स्थान पटकाविण्यात राज्य व पुणे परिसरातील अळिंबी उत्पादकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन सोलन येथील (हिमाचल प्रदेश) अळिंबी संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. व्ही. पी. शर्मा यांनी केले.
सोलन येथील अळिंबी संचालनालय आणि पुणे कृषी महाविद्यालय यांच्या वतीने अळिंबी उत्पादनाची सद्यःस्थिती, समस्या व उपाय आणि पुढील दिशा याविषयावर मंगळवारी (ता. २०) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अळिंबी संशोधन सल्लागार समितीचे सदस्य रामदास शिंदे, डॉ. श्वेत कमल, डॉ. सतिश कुमार, डॉ. अनुपम भार, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. अशोक जाधव व डॉ. विकास भालेराव उपस्थित होते.
श्री. शर्मा म्हणाले, की जगात चीन सर्वाधिक अळिंबी उत्पादन घेत असून त्या देशाबरोबर स्पर्धा करण्यासाठी आपल्याला मोठा पल्ला गाठावा लागणार असून महाराष्ट्राप्रमाणेच इतरही राज्यांनी अडचणींवर मात करीत अळिंबी उत्पादनामध्ये सातत्य राखल्यास हे चित्र बदलू शकते. सध्या देशापुढे वाढती बेरोजगारी, कुपोषण, जमिनींचे ढासळते आरोग्य व उत्पादनक्षमता, उत्पादन वाढीसाठी उपलब्ध जमिनींवर वाढलेला ताण, पाणी आदी समस्या असून त्यावर अळिंबी उत्पादन हा एक रामबाण उपाय आहे.
या वेळी डॉ. प्रमोद रसाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक जाधव यांनी केले. कार्यशाळेत अठरा जिल्ह्यांतील ८० अळिंबी उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.