सातारा : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांत तक्रारी झाल्या आहेत. यातील काही तक्रारीत तथ्य आढळून आले आहेत. पुढील काळात तक्रारी येऊ नये अशा पद्धतीने कामे करा. जे अधिकारी जबाबदारीने वागत नसतील त्यांच्या बदल्या केल्या जातील, असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक जिल्हा मध्यवर्तीच्या बॅंकेच्या सभागृहात शुक्रवारी (ता.१३) आयोजित करण्यात आली होती.
त्या वेळी श्री. शिवतारे बोलते होते. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, कृषी उपसंचालक गुरूदत्त काळे, आत्मा संचालक श्री. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. शिवतारे म्हणाले, की रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन वाढवत असताना दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन केले जावे. मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून गावात काय बदल झाले यांची सविस्तर माहिती घ्यावी.
जलसंधारणाची कामे करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन समन्वयाने कामे केली जावी. गतवर्षाच्या हंगामात खताचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक का आहे. तसेच महाबीज बियाण्याचे उत्पादन का कमी प्रमाणात मिळत आहे, याबाबतची माहिती घेतली जावी. कृषी उन्नत योजनेतून केले जाणारे अवजारे वितरणाचे काम पारदर्शक पद्धतीने केले जावे. तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना राज्याच्या खरिप आढावा बैठकीत मांडल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शशिकांत शिंदे म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियान नसलेल्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करावी. उत्पन्न आणि हमीभाव यांची सांगड घातली जावी. गाळ काढण्यासाठी शासनाकडून दिले जाणाऱ्या इंधनास मर्यादा घालण्यात आली असल्याने कामावर परिणाम होऊ लागला आहे. शासनाने ही अट शिथिल करावी, अशी मागणी केली. बाळासाहेब पाटील म्हणाले, की बियाणे व खते यांचा मागणीच्या तुलनेत पुरवठा केला जावा.
आमदार शशिकांत शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी अनेक कामांना निधी उपलब्ध होत नाही, या कामात अनेक अडचणी येत असतानाही अधिकारी सांगत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. शिवतारे म्हणाले, की जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील काही कामांत त्रुटी आढळून आल्या आहेत.
जिल्ह्यात या अभियानातून झालेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश दिले. तसेच या कामांसाठी लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
बियाणे, खते, कीटनाशके विक्रीसाठीच्या परवाने देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून काढून घेतले आहे. हे परवाने देण्याचा अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दिला जावा, अशी मागणी मनोज पवार यांनी केले. सुनील बोरकर अहवाल वाचन केले. आत्मा उपसंचालक विजय राऊत यांनी आभार मानले.