गडचिरोली : येत्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच खरीप आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.
बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दयावे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही. याबाबत बॅंकांनी दक्ष राहण्याचे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, अशा सुचना खासदार अशोक नेते यांनी दिल्या.
सर्व बॅंकांना मिळून ८५ कोटी १७ लाख २७ हजार रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी एक लाख ८२ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली होती. या वर्षी दोन लाख हेक्टरवर धान लागवड होईल. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच हजार ६४६ हेक्टर असले, तरी यावर्षीच्या हंगामात ते कमी होण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षी केवळ ३९३ हेक्टरवर सोयाबीन लागवड होती. कापसाचे क्षेत्र वाढत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मागील वर्षी सुमारे १४ हजार ४६१ हेक्टरवर कापूस होता. या वर्षी १५ हजार हेक्टरवर हे क्षेत्र पोचेल. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील ५० गावांतील २९६ आदिवासी शेतकऱ्यांना परसबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी दिली.