जळगाव : खानदेशात पेरणी सुमारे ८६ टक्के क्षेत्रावर झाली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाऊस बऱ्यापैकी असल्याने पेरणी सुरू आहे. जळगावात पावसाअभावी अनेक भागात उशिराची पेरणी रखडली आहे.
कापसाची लागवड खानदेशात सुमारे नऊ लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट असून, मागील गुरुवारपर्यंत (ता.२५) जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. कापूस लागवड आणखी काही भागात होवू शकते. कारण कमी पावसात अनेक शेतकऱ्यांना पीक मोडावे लागले आहे. धुळे जिल्ह्यातही पेरणी सुमारे ८७ टक्के क्षेत्रात झाली आहे. तर, नंदुरबारातही सुमारे ८४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. धुळे, नंदुरबारात पावसाची स्थिती बरी आहे. धुळे जिल्ह्यात ३० जूनपर्यंत एकूण १४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या २३ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये मात्र सुमारे १२ दिवस पावसाचा खंड राहिला. या दरम्यान ऊन तापत होते. हलक्या व मुरमाड जमिनीत पिके मोडण्याची वेळ आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात दुबार पेरणी केली. परंतु, पुन्हा मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. ऊन तापत आहे. पेरणीवर पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
जळगावात अनेक ठिकाणी नापेर जमीन
जळगाव जिल्ह्यात अद्याप अनेक शेतकऱ्यांची जमीन नापेर आहे. पेरणी ९० ते ९५ टक्के अपेक्षित आहे. पुढे बाजरीची पेरणी अनेक शेतकरी करतील. परंतु, त्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.