खान्देशात कानुबाईचा उत्सव आनंदात साजरा
जळगाव : श्रावणात नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी (ता.१८) खानदेशात कानुबाईचा उत्सव सुरू झाला. रविवारी (ता.१९) घरोघरी विधिवत पूजा झाली. कानुबाईची गीते म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला. घरोघरी स्थापना झालेल्या कानुबाईचे विसर्जन सोमवारी (ता.२०) सकाळी सुरू झाले. अनेक ठिकाणी वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. महिला, मुली, बालगोपाळांनी या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.
या उत्सवानिमित्त बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिनित्त स्थिरावलेली मंडळी आपापल्या गावी आली होती. गावांमध्ये चैतन्य, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कानुबाईमाता उत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. त्यासाठी मुहूर्त पाहत नाहीत. नागपंचमीनंतरच्या येणाऱ्या शनिवारी व रविवारी रोट होतात.
चाळीसगावजवळ उमरखेड येथे कानुबाईचे मंदिर आहे. ज्यांना प्रथमच कानुबाईची स्थापना करायची होती, त्यांनी एक नारळ उमरखेड येथील मंदिरातील कानुबाईच्या मूर्तीला स्पर्श करून आणले. या नारळाची सजावट करून त्याची स्थापना केली. नथ, इतर पारंपरिक दागिने त्यास चढविण्यात आले. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून कानुबाईची स्थापना झाली. आरती, नैवेद्य दाखविण्यात आले. नैवेद्यात पुरणपोळ्या, पुरणाचे दिवे तयार केले होते. आमटी, भाजी, कांस्य धातूने तयार केलेल्या ताटात ठेवून देवीला ओवाळण्यात आला.
रविवारी दुपारी फुगड्या, गाणी म्हटली जात होती. रात्री जागरण करण्यात आले. काही भक्तांनी तयार केलेले रोट (विनातेलाच्या जाड पोळ्या) परातीत घेऊन कानुबाईचे दर्शन घेतले. सोमवारी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण करण्यात आली.