नगर : जलयुक्त शिवार अभियानातून चालू वर्षाची (२०१७-१८) कामे अजून सुरू झालेली नाहीत. ती नव्या वर्षांत सुरू होणार आहेत. प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार एक लाख २१ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर ही कामे होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाभरात निवडलेल्या २४१ गावांत एकूण ९८०१ कामे होणार असून कर्जत आणि अकोले तालुक्यात सर्वाधिक कामे असतील.
जलयुक्त शिवार अभियानातून दोन वर्षांत झालेल्या कामाचे चांगले परिणाम दिसू लागले असल्यामुळे प्रशासनाने अन्य कामांपेक्षा ‘जलयुक्त’ची कामे सर्वाधिक कशी होतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
पहिल्या वर्षी निवडलेल्या २७९ गावांत १४ हजार ६४८ तर दुसऱ्या वर्षी निवडलेल्या २६८ गावांत ८३१७ कामे झाली आहे. यंदा निवडलेल्या २४१ गावांतील कामे अजून सुरू झालेली नसली तरी या गावांत ९८०१ कामांतून १ लाख २१ हजार ३२० हेक्टर क्षेत्राला बळकट करण्याचे नियोजन केले आहे.
सर्वाधिक २१३७ कामे कर्जत तालुक्यात होणार असून तेथील ३० हजार ५८६ हेक्टर तर अकोले तालुक्यात १४७९ कामांतून ४ हजार ५४४ हेक्टर क्षेत्र बळकट करण्याचे नियोजन आहे. ४५६६ हेक्टर क्षेत्रावर प्राधान्याने जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असून १,१६,७५३ हेक्टर क्षेत्रावर नव्याने कामे केली जाणार आहेत.
जलयुक्त शिवार अभियानातून २२३ कोटी ५८ लाखांचा निधी प्रस्तावीत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक कामे होणार असून लोकांचा सहभाग चांगला असून असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.
तालुकानिहाय क्षेत्र (हे.) : नगर ः १२,३१९, पारनेर ः १४,२९४, पाथर्डी ः ५९६४, कर्जत ः ३०,५८६, श्रीगोंदा ः ८१८३, जामखेड ः १९,१०४, श्रीरामपूर ः २६०, राहुरी ः १८६४, नेवासा ः ५५३९, शेवगाव ः ७०२५, संगमनेर ः ८६७६, अकोले ः ४५४४, कोपरगाव ः २६३०, राहाता ः ३२०.