नगर ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१२ पासून आतापर्यंत ५१९५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहे. अजून ११२१ कामे अपूर्ण असून ती पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या तीन वर्षांत जवळपास २६३२ कामे पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. विहिरींचा लाभ ही वैयक्तिक लाभाची योजना समजली जाते. ग्रामपंचायतींकडून ग्रामसभेतून लाभार्थ्यांच्या नावाला मान्यता मिळाल्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पातळीवर मंजुरी दिली जाते. सुरवातीला विहिरींसाठी दोन लाख रुपयाचे अनुदान दिले जात होते. आता तीन लाखांचे अनुदान दिले जाते.
गाव पातळीवर मजुरांची नोंदणी केलेली असून जॉबकार्ड दिलेले आहेत. त्या मजुरांना रोजगाराची गरज पडल्यास जी कामे सुरू केली जातात त्यात विहिरींचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ही कामे पूर्ण केली जात आहेत.
जिल्ह्यात २०१२ पासून ६३१६ विहिरींना मंजुरी मिळालेली आहे. त्यातील ५ हजार १९५ विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. ११२१ कामे अपूर्ण आहेत. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात २ हजार ६३२ कामे पूर्ण झाली आहेत.
२०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू झाली. या योजनेतून ३८०० विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यातील १५०७ कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मंजुरी मिळालेली परंतु वेगवेगळ्या कारणाने तब्बल ३८९ कामे सुरू होऊ शकली नाही. ही कामे सुरू करण्याबाबत सातत्याने सांगितले गेले असले तरी ग्रामपंचायत विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
मंजूर विहिरी कामे (कंसात पूर्ण झालेली कामे)
अकोले ः ५४६ (४४९), जामखेड ः ६८० (६४४), कर्जत ः ६१३ (५३५), कोपरगाव ः ४३१ (३१७), नगर ः २८० (१९९), नेवासे ः १९८ (९६), पारनेर ः ९८६ (८२६), पाथर्डी ः ८२१ (६९३), राहाता ः २४४ (२३८), राहुरी ः १८९ (१२६), संगमनेर ः ३५९ (२७४), शेवगाव ः ५३१ (४५५), श्रीगोंदे ः ३८० (२९७), श्रीरामपूर ः ५८ (४६).