सांगली (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे नुकसान झालेल्या कापसाचे पंचनामे कृषी विभागाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबतचे वृत्त बुधवारी (ता.२०) ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. पंचनाम्याचे प्रस्ताव तयार करून ते कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी दिली .
जिल्ह्यात मिरज तालुकाच्या पूर्व भाग व आटपाडी तालुक्यातील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील कापसाचे एकूण क्षेत्र किती, कापसाचे किती टक्के नुकसान झाले आहे, याबाबतची माहिती घेतली आहे. मिरज पूर्व भागात सुमारे १२ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड असून याचे पंचनामे झाले आहेत. पंचनाम्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी हे प्रस्ताव शासनाकडे देणार आहेत.