ऊसतोडणी कामगारांचे दर दुप्पट न केल्यास आंदोलन
माळीनगर, जि. सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने विविध मागण्यांसाठी यंदा संपाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा या संघटनेने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मजूर आणि मुकादम संघटनेने या संपात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन १९८६ मध्ये स्थापन झालेली संघटना आहे. राज्यातील १२ लाख ऊसतोडणी कामगार या संघटनेशी निगडित आहेत. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी १५ ऑक्टोबर २०११ ला झालेल्या चर्चेतून या संघटनेचा साखर संघाशी करार झाला होता.
दरम्यान, यंदा राज्यात जवळपास ११ लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता यंदाचा गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, ऊसतोडणी कामगारांचा संप झाल्यास गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कारखान्यांपुढे पेच उभा राहण्याची चिन्हे आहेत.
ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या
ऊसतोडणी कामगारांच्या दरात आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी. शासनाने जाहीर केलेली २०१४ -१५ची २० टक्के दरवाढ मिळावी. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी.