बागायत, जि. सिंधुदुर्ग ः येथे पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ः सिंधुदुगमध्ये पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता. १८) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कापणीला आलेले भातपीक या पावसामुळे संकटात सापडले आहे.
जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. याचा जोर मंगळवारी (ता. १९) कायम होता. समुद्रही खवळला आहे. वादळसदृश स्थितीमुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने मच्छीमारांना केले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरजन्य स्थिती आहे.
देवबागमध्ये कर्ली खाडीच्या उधाणाचे पाणी घुसले. मालवण शहरात अनेक भागांत पाणी साचले. बागायत येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मसुरेमध्येही पाणी साचल्याने अनेक भागांत वाहतूक ठप्प झाली आहे. आंबेली पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. मुसळधार पावसामुळे भीतीचे वातावरण आहे.
मसुरेत दरड
मसुरे-तळाणीवाडी येथे पावसामुळे दरड कोसळल्याचा प्रकार घडला. यामुळे तेथील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास तीव्रता वाढण्याची भीती आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
शेती धोक्यात
जिल्ह्यात बहुसंख्य भातशेती कापणीच्या जवळपास पोचली आहे. या पावसामुळे भातखाचरांमध्ये पाणी घुसले व साचले आहे. यामुळे भात कुजण्याची भीती आहे.
रत्नागिरीतही जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. हा पाऊस हळव्या पिकांसाठी धोक्याचा ठरत आहे. हर्णे (जि. रत्नागिरी) बंदराजवळ पाच मच्छीमार नौका बुडाल्या असून, पाचजण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.