नगर ः जिल्ह्यात हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नऊ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याला नाफेडने परवानगी दिली आहे. साधारण पाच- सहा दिवसांत ही खरेदी केंद्रे सुरू होतील, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये चांगला झालेला पाऊस आणि कापसाचे बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. अनेक ठिकाणी वाया गेलेला कापूस काढून त्याजागी हरभरा पेरला गेला. त्यामुळे हरभऱ्याचे ८३ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र असून, यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ८५,४५३ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली.
आता हरभऱ्याचे पीक काढणीला आहे.
त्यामुळे बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे. दर दिवसाला २०० ते ३०० क्विंटल हरभऱ्याची आवक बाजार समितीत होत आहे. मात्र, हमीभावाच्या तुलनेत बाजार समितीत १००० ते १२०० रुपये कमी दराने तो खरेदी केला जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय खरेदी केंद्र सुुरू करण्याची मागणी केली जात होती.
जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चौदाही तालुक्यांतील बाजार समितीत हरभऱ्याची होणारी आवक, मिळणारा दर आणि लोकांची मागणी याबाबींचा विचार करून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज असल्याबाबत महिनाभरापूर्वीच नाफेडला पत्र देऊन कळवले होते.
जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल खरेदी अपेक्षित असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यानुसार जिल्हाभरात नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याला परवानगी मिळाली आहे, मात्र केंद्राची नावे अजून कळलेली नाहीत असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात श्रीरामपूर, राहाता, कर्जत, पाथर्डी, नगर, श्रीगोंदा, नेवासा, कोपरगाव या तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र अधिक आहे.