नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी केंद्रावर ३८३६ शेतकऱ्यांकडून ३८ हजार १३८ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. यंदा साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याची अपेक्षा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतीमालास दर्जा नसल्याचे सांगून हमीभावापेक्षा साधारण एक हजार रुपये कमी दराने हरभरा खरेदी केली जात असल्यामुळे तुरीप्रमाणेच हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर दिवशी होणारी आवक आणि मिळणाऱ्या दराची माहिती संकलित करून हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती.
यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर (८५ हजार ४५३ हेक्टर) हरभऱ्याचे पीक घेतले गेले असल्याने उत्पादनही चांगले निघाले आहे. मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी करण्याचे निश्चित केले गेले. त्यानुसार जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३८३६ शेतकऱ्यांकडून ३८ हजार १३८ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.
तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीसाठीही शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. यंदा जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी व्यक्त केला.