सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणागंण सुरू आहे. प्रथमच सरंपचपदाची थेट जनतेतून निवडणूक होत असल्याने उत्साही कारभाऱ्यांकडून निवडणुकीचा प्रचार हायटेक पद्धतीने केला जात आहे.
व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडियाबरोबच अँड्रॉईड मोबाईलचे विविध प्रकारची ॲप, व्हॉइस कॉलिंग, टेक्स मेसेजचा प्रचारासाठी वापर गावागावांत केला जात आहे.
जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
या निवडणुकीत विनातक्रार ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित २६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही गावागावांत हायटेक प्रचार केला जात आहे.
या अगोदरच्या निवडणुकांत बॅनर, स्पीकर तसेच थेट मतदारांना भेटून मते मागितली जात होती. या निवडणुककीत मात्र कारभाऱ्यांकडून प्रचाराच्या माध्यमात बदल करण्यात आला आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
सध्याच्या युगात इंटरनेटचा सर्रास वापर केला जात आहे. या वापराचा गावच्या कारभाऱ्यांकडून फायदा घेतला जात आहे. निवडणुकीतील उमदेवारांनी मोबाईल ॲपद्वारे लिंक तयार केली अाहे. ही लिंक मेसेजद्वारे मतदारांना पाठवली जात आहे. या लिंकवर क्लिक करताच उमेदवार व त्यांच्या पॅनेलची माहिती मिळत आहे.
खासदार, आमदारकीच्या निवडणुकीत व्हॉइस कॉलचा वापर केला जात होता. आता या तंत्रज्ञानाचा ग्रामपंचायत निवडणुकातही वापर केला जात आहे. एकूणच या निवडणुकीत हायटेक प्रचाराने रंगत आली आहे.
जाहीरनाम्यातून मोठी अाश्वासने
या निवडणुकीत उमेदवार तसेच पॅनेल प्रमुखाकडून आपले पॅनेल तसेच उमेदवारांचा विजय होईल यासाठी जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात अाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे जाहीरनाम्यातून मोठी अाश्वासने दिली जात आहे.
शासकीय धोरणामुळे सरपंचाचे अधिकार आणि निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या निधीचा उपयोग करत गावाचा कसा विकास करता येईल, याचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.