यवतमाळ ः राज्याच्या इतर जिल्ह्यातील मजूर आपापल्या गावी आले आहेत. मागेल त्याला काम या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच बाहेरुन आलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश वने, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी मनोज चौधर उपस्थित होते.
यावेळी श्री. राठोड म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे आत्तापासूनच उत्कृष्ट नियोजन करुन ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे तातडीने सुुरू करा. या मजुरांना जॉबकार्ड उपलब्ध करुन द्या. मजुरांना काम देण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी योग्य नियोजन करा. तसेच काम मागणाऱ्या मजुराला आपण काम दिले, असे दिसले पाहिजे.
तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी विस्थापित मजुरांची गावनिहाय माहिती संकलीत करावी. त्यानुसार काम उपलब्धतेबाबत नियोजन करावे. पावसाळ्यात सुरू होणाऱ्या कामांचा सेल्फ तयार करावा. ‘रोहयो’च्या सुरू होणाऱ्या कामांना विनाविलंब तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कोणीही कामापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना ही मंत्री राठोड यांनी केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.