जळगाव ः जिल्ह्यात १० व ११ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीमुळे केळीसह गहू, मका आदी पिकांचे नुकसान झाले. नंतर पुन्हा १७ मार्चला वादळी पाऊस झाला. यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत, परंतु भरपाईचे काय, हा प्रश्न कायम आहे.
१० व ११ मार्च रोजी झालेल्या पावसात जामनेरातील सुमारे १९०० हेक्टरवरील गहू, मका व केळीचे नुकसान झाले. जळगावमधील सुमारे १४५ हेक्टरवरील केळी पिकासह भुसावळ व मुक्ताईनगर येथेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता.
त्यानंतर जळगावात केळी पिकाचे नुकसान झालेच नाही, असे पंचनामे करताना आढळल्याचे सांगितले. २३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. नंतर हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला, परंतु त्यावर निर्णय काय झाला व भरपाईसाठी कुणाची निवड झाली हे स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर १७ मार्चला झालेल्या पावसातही जळगाव, भुसावळ, जामनेर भागांत नुकसान झाले होते. सुमारे ४७३ हेक्टरवर नुकसानीचा अंदाज होता.
परंतु यातील किती नुकसानग्रस्तांना भरपाईसंबंधी समाविष्ट केले, हे कृषी विभागाने स्पष्ट केलेले नाही. जे नुकसान मार्च महिन्यात दोनदा झाले. त्यात फारशा शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांवर झालेले नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कमही तोकडीच येईल. फारशा शेतकऱ्यांचा समावेश नुकसानीच्या यादीत केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
यातच गारपीट होऊन सुमारे १५ पेक्षा अधिक दिवस झाले. तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे यंत्रणा फिरकलीच नाही. जे पंचनामे केले, त्यात धरसोड वृत्तीने कार्यवाही झाली. त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहीले.
शिवाय शासन व यंत्रणा या गारपीटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याने अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शेतकरी खरीप हंगामात मोठा फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न न आल्याने अडचणीत आले आहेत. सध्या बॅंकांचे कर्ज भरायचे आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाही. यामुळे समस्या अधिकच्या वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.