कोल्हापूर जिल्ह्यात संततधारेने शेतकरी त्रस्त
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार मंगळवारी (ता. २८) दुपारपर्यंत सुरूच राहिली. गगनबावड्यात सर्वाधिक ७१ मि.मि पाऊस झाला. दोन दिवसांपासून पुन्हा पावसास सुरवात झाल्यापासून अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या पश्चिम भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ३२०.८१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरी २६.७३ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान राधानगरी धरणाचे उघडलेले दरवाजे मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होते. यामुळे नद्यांचे पाणी तातडीने कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने बहुतांशी धरणांचे पाणी सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी विभागाने काही धरणांतील विसर्ग घटविला होता. परंतु, पुन्हा पावसाने सुरवात केल्याने धरणांतून पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील नद्यांवरील पाण्याखालील २८ बंधारे पंचगंगा - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ भोगावती - हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे वारणा - चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी दूधगंगा - सुळंबी, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे, तुरंबे कासारी - यवलूज वेदगंगा - निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे, चिखली
तालुकानिहाय पाऊस हातकणंगले १२.२५, शिरोळ १७.१४, पन्हाळा १२.५७, शाहुवाडी २३.५०, राधानगरी २६.६७, करवीर १०.९१, कागल २५.८६, गडहिंग्लज १७.८६, भुदरगड ३२.८०, आजरा ३८.७५ व चंदगड ३१.०० अशी एकूण ३२०.८१ मि.मि.