जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून २०१९-२० या वर्षासाठी जिल्ह्यात २८७ कोटी रुपये परताव्यांपोटी आल्याचा गाजावाजा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी केला. श्रेय घेण्याची लाटालाट सुरू झाली. परंतु, अद्याप या योजनेत सहभागी झालेले अनेक पात्र केळी उत्पादक परताव्यांपासून कर्जखाते बंद करणे, चुकीचे कर्ज खाते पुरविणे या प्रकारामुळे वंचित आहेत.
यासंदर्भात चहार्डी (ता.चोपडा) येथील शेतकरी संदीप पाटील यांनी ‘ॲग्रोवन’कडे या घोळाचा कसा फटका आपल्याला बसला, याची माहिती दिली आहे.
संदीप म्हणाले, ‘‘चोपडा येथील एचडीएफसी बँकेतून केळी पिकासंबंधी पीक कर्ज घेतले होते. या पीक कर्जांतर्गत २०१९-२० च्या हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालो. त्यासंबंधी बँकेतर्फे चार हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले. त्याचा विमा हप्ता विमा कंपनीकडे बँकेच्या माध्यमातून भरण्यात आला. विमा योजनेत परताव्यांसाठी चहार्डी व परिसरातील केळी उत्पादक पात्र ठरले.’’
‘‘विमा योजनेतून परतावे जुलै महिना संपताच ४५ दिवसात मिळणे अपेक्षित होते. परंतु, परतावे देण्यास विमा कंपनीने उशीर केला. हे परतावे इतर केळी उत्पादकांना बँक खात्यात प्राप्त होण्यास सुरवात झाली. पण मला परतावे मिळाले नाहीत. मी एचडीएफसी बँकेत चौकशी केली. तेथे माझे पीक कर्जखाते कर्जाची परतफेड केल्यानंतर बंद करण्यात आले होते. मी कर्जाची परतफेड केली व पुन्हा या बँकेकडून पीक कर्ज घेतले नाही. या कारणामुळे मला एचडीएफसी बँकेत परतावे अजूनही प्राप्त झालेले नाहीत. मी बँकेला बचत खात्यात परताव्यांचा निधी जमा करा किंवा अन्य बँकेच्या खात्यात हा निधी ट्रांसफर करा, अशी विनंती केली. परंतु, कार्यवाही होत नाही.’’
इतर अनेक शेतकरी या कर्जखात्याच्या घोळामुळे परताव्यांपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांचे चुकीचे कर्जखाते क्रमांक विमा कंपनीकडे देण्यात आले आहेत. बँका यासाठी जबाबदार आहेत. याप्रकारासंबंधी तोडगा काढावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.