सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यापूर्वी पूर्वसंमती घेतले नसल्याचे कारण देत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस खीळ बसणार आहे. तसेच संच बसवूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जावा या दृष्टीने पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहान मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र २०१६-१७ मध्ये १४०० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले नाही.
या संदर्भात कृषी विभागाकडून महिती घेतली असता या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेतली नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेतली नाही, तर ऑनलाइन नोंदणी कशी करून घेतली, प्रस्ताव कसे सादर करून घेतले हा यासारखे प्रश्न निर्माण होत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मृद्गल यांनी जिल्ह्यात जास्ती जास्त शेतजमीन ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ अशी घोषणा करत जनजागृत्ती करण्यास सुरवात केली होती. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ठिबक संच वापरण्याकडे वळले आहेत. या संकल्पनेचे तत्कालीन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी कौतूक केले होते. मात्र अनुदानातील वांरवार विलंबामुळे ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस घरघर लागण्याची शक्यता आहे.
शेतीमालाच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून पाणीबचतीसाठी कर्ज काढून ठिबक संच बसवित आहे. मात्र अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या अगोदर २०१२-१३ मध्ये ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे जिल्ह्यातील १३०० शेतकऱ्यांना अनुदानपासून वंचित रहाण्याची वेळ आली होती. या वेळी मात्र पूर्वसंमती न घेतल्यामुळे अनुदान दिले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु पूर्वसंमती घेतली नसतानाही प्रस्ताव कोणत्या आधारावर घेण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.
२०१६-१७ मध्ये अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी कोरेगाव, खटाव तालुक्यातील आहेत. कोरेगाव व खटाव या दुष्काळी तालुक्यांचा कल उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याकडे वाढला आहे. मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. २०१७-१८ मधील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना आमचे मागील वर्षाचे अनुदान का मिळेना, यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.