शिरोळ, जि. कोल्हापूर : येथील श्री दत्त शेतकरी सह साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार पंचवीस रुपयांची उचल दोन हप्त्यात देण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याचे अकरा लाख गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचा २०१७ -१८ चा गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (ता.९) झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दत्त साखर कारखान्याची एफआरपी दोन हजार आठशे पंचवीस इतकी होते.
एफआरपी पेक्षा दोनशे रुपये अधिक देणेचा तोडगा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केला अाहे. यामुळे गाळपानंतर पंधरा दिवसांत दोन हजार नऊशे पंचवीस रुपये व त्यानंतर कांही दिवसांनी शंभर रुपये असे तीन हजार पंचवीस रुपये दोन हप्त्यांत देणेचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला अाहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.