कोयना धरणाचे संग्रहित छायाचित्र
सातारा ः जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५.१३ टीएमसी पाणी जास्त असून, या धरणात गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. राज्यातील वीजनिर्मितीच्या दृष्टीने हा साठा फायदेशीर ठरत आहे.
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने प्रमुख प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने प्रकल्प व्यवस्थापनास सर्वच धरणांतून पाणी सोडावे लागले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या.
कोयना धरणाची एकूण क्षमता १०५.२५ टीएमसी असून, सध्या धरणात एकूण ४०.२२ टीएमसी तर ३५.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सध्या ३५.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात यंदा १५.१३ टीएमसी पाणी जास्त असल्याने वीजनिर्मितीस तसेच या नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठीदेखील पाणी मिळत आहे.
धोम, कण्हेर व उरमोडी ही धरणे दुष्काळी तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या तीनही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. यामध्ये उरमोडी धरणात सर्वाधिक ५७.९९, कण्हेरमध्ये ३२.१७ तर धोम धरणात २८.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच तारळी धरणात २५.१३ तर धोम-बलकवडी धरणात १५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.