सातारा : पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम- बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. कोयना धरण हे वीजनिमिर्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणाची पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून दोनवेळा पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. इतर धरणांचीही हीच परिस्थिती झाली होती.
या सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आले होते. वीजनिमिर्तीच्या महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात ९०.१५ टीएमसी म्हणजेच ९०.०३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्याच्या दृष्टीने उरमोडी धरण महत्त्वाचे आहे. या धरणात ९.१७ टीएमसी म्हणेजच ९५.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई कमी भासण्यास मदत होणार आहे; मात्र अजूनही या धरणाची कालव्याची कामे अपूर्ण असल्याने पाणी असून, शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. धरण लाभक्षेत्रात असलेल्या शेतजमिनीस पाणी मिळावे, यासाठी कालव्याची कामे केली जावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महू, हातेघर, नागेवाडी, उत्तरमांड, मोरणा, येरळवाडी या कमी क्षमता असलेल्या धरणात पाणीसाठा चांगला असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हा पाणीसाठा फायदेशीर ठरणार आहे.