पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब भरली आहेत. भाटघर, पवना, वडज धरण क्षेत्रात रविवारी (ता. १५) पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील बारा धरणांतून विसर्ग सुरू आहे.
मुळशी, टेमघर, खडकवासला, कासारसाई, आंद्रा, भामा आसखेड, येडगाव आणि पिंपळगाव जोगे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव, विसापूर, डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी आणि वीर या बारा धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामध्ये वरसगाव, पानशेत आणि खडकवासलासह डिंभे, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, भाटघर, नीरा देवधर आणि वीर या धरणांचा समावेश आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. मात्र, रविवारी दिवसभरात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे मुठा नदीत विसर्ग करण्यात आला नाही.
पिंपळगाव जोगे धरण ९६.०७, माणिकडोह ८३.१०, वडज ९९.९७, घोड ९९.७६, मुळशी ९७.०५, टेमघर ५४.०६, गुंजवणी ५८.९३, नाझरे धरण ५४.९८ टक्के भरले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६३ मिमी पाऊस झाला. सध्या या धरणात ९७.०५ टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला धरण परिसरात २७ मिमी पावसाची नोंद झाली. घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२, वडिवळे येथे २० आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७ मिमी पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस (मिमी) ः पिंपळगाव जोगे ६, माणिकडोह २, येडगाव ५, डिंभे १, विसापूर १४, कळमोडी ५, चासकमान ४, भामाआसखेड ५, आंद्रा ४, कासारसाई ७, मुळशी ६३, खडकवासला २७, घोड २५, टेमघर २२, वडिवळे २०, वरसगाव १७, पानशेत १७, गुंजवणी २, नीरा देवधर २, वीर ४.
शंभर टक्के भरलेली धरणे ः येडगाव, डिंभे, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरा देवधर, भाटघर, वीर.