जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये हवा तसा वाफसा नसल्याने सोयाबीन व ज्वारी कापणीची कामे जवळपास ठप्पच आहेत. त्यातच सोयाबीन काढणीच्या कामासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या हार्वेस्टरधारकांनाही रोजगार नसल्याचे चित्र आहे.
कापणीवर आलेल्या सोयाबीनचा कोरडा पाला पावसामुळे गळून गेला आहे. शेंगा ओल्या असून, शेतातही चिखल असल्याने वाफसा नाही. त्यामुळे मजूरही कापणी करू शकत नाहीत. चोपडा, जळगाव, यावल भागांत सोयाबीन अधिक असून, कापणी रखडल्याने नुकसानीची भीतीही वाढत आहे.
कापणी झाली असती तर सोयाबीन गोळा करून त्याचे ढीग शेतात लावण्याचेही काम झाले असते. या ढिगांवर ताडपत्री झाकून त्याचा बचाव पावसापासून करणे शक्य होते. परंतु कापणीअभावी सोयाबीन शेतात तसाच उभा आहे. थोडा पाऊस आला तरी शेंगांचा दर्जा घसरत आहे. शेंगा फुगून त्यातून कोंब निघण्याची स्थिती सध्या आहेत. त्यातच आता दिवाळीमुळे मजूरही मिळणे दुरापास्त झाले आहे.
जशी सोयाबीनची स्थिती आहे, तशीच स्थिती ज्वारीचीदेखील आहे. ज्वारीदेखील कापणीवर आली आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात ज्वारी आहे. धरणगाव, रावेर, यावल व चोपडा भागात बेवड म्हणून ज्वारीची पेरणी अधिक केली जाते. परंतु पावसामुळे ज्वारीची कापणीही जवळपास बंदच आहे. मुरमाड, हलक्या जमिनींच्या भागात ज्वारीची कापणी करून घेतली जात आहे.
जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागांत अनेक हार्वेस्टरधारक सोयाबीन काढणीसाठी आले आहेत. दिवाळीपूर्वी दरवर्षी ते दाखल होतात. परंतु सध्या वाफसा नसल्याने हार्वेस्टरही शेतात जाऊ शकत नाही. रस्तेही चिखलमय झाले आहेत. हार्वेस्टरने काढणीसाठी पाऊस थांबल्यानंतर किमान १० दिवस कोरड हवी आहे.