जळगाव : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) १३ कापूस खरेदी केंद्रे सुरू होऊन १० दिवस झाले, पण यातील एकाही केंद्रावर एक बोंडही कापूस आलेला नाही. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत असल्याने या केंद्रांवर कुठलीही आवक होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात २५ ऑक्टोबरनंतर एकामागून एक अशी खरेदी केंद्र सीसीआयने सुरू केली. सर्वांत प्रथम नंदुरबार येथील केंद्र सुरू झाले. नंदुरबारसह जळगाव, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव, रावेर, चोपडा, शिरपूर, शहादा, पाचोरा येथे खरेदी केंद्र सुरू झाले. यातील कुठल्याही केंद्रात कापूस खरेदी झालेली नाही. या केंद्रात उत्तम दर्जाच्या कापसाला कमाल ४३२० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. तर खासगी व्यापारी गावोगावी जाऊन किंवा थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन ४५०० रुपये प्रतिक्विंटल या दरात कापूस खरेदी करीत आहेत.
त्यामुळे या केंद्रांमध्ये कुठलीही आवक होत नसल्याचे चित्र आहे. अर्धाअधिक कापूस गुजरातलगतच्या जिनिंगमध्ये चोपडा, शहादा, शिरपूर भागांतून अर्धाअधिक कापूस गुजरातमध्ये गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिनिंगमध्ये पोचला आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर गुजराती जिनर्सच्या मध्यस्थांची खानदेशात कापसाची खेडा खरेदी सुरू होती. आता तिसऱ्या, चौथ्या वेचणीचा कापूस यायला सुरवात होताच पुन्हा खेडा खरेदी सुरू झाली आहे.
सीसीआयने मागील हंगामात खुल्या बाजारात कापसाची खरेदी केली होती. म्हणजेच खुल्या बाजारात जे प्रचलित दर होते त्यात आपल्या केंद्रात येणाऱ्या कापसाची खरेदी केली होती. यंदा फक्त हमीभावातच कापूस खरेदीवर सीसीआय अडून राहिले तर कुठलीही कापूस खरेदी होणार नाही. त्यामुळे सीसीआयला खुल्या बाजारात कापूस खरेदीशिवाय पर्याय नाही, असे मत कापूस बाजारपेठ विश्लेषकांनी म्हटले आहे.