केळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
रावेर, जि. जळगाव : पावसाळ्याचे सव्वादोन महिने संपूनही सातपुड्याच्या पट्ट्यात सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे चोपडा, रावेर व यावल पट्ट्यातील सुमारे दहा हजार विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालवली आहे. परिस्थिती कायम राहिली तर उन्हाळ्यात केळीच्या बागा वाचविणे कठीण होईल. केळी उत्पादक अडचणीत येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सातपुड्याच्या पट्ट्यातील सुमारे दहा हजार विहिरी-कूपनलिकांची पाणीपातळी या काळात नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे वाढते असा अनुभव आहे. मात्र, या वर्षी पुरेसा पाऊसच झालेला नाही. येथील जमिनी ओलिताखाली असल्याने पावसाने ओढ देऊनही पीकस्थिती फारशी गंभीर नाही.
शेतकरी सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र, उन्हाळ्यात केळीला फटका बसण्याची भीती आहे. चोपडा, यावल भागातही स्थिती बिकट बनत आहे. अनेक धरणांतही २५ टक्के जलसाठा झालेला नाही. गूळ प्रकल्प कोरडा होत आहे. प्रकल्पांचा साठा चिंताजनक ः तालुक्यातील हतनूर (२१), गंगापुरी (३२), मंगरूळ (४४), अभोरा (४० ), सुकी (५५), यावल तालुक्यातील मोर (२४ टक्के) असा अत्यल्प पाणीसाठा आहे. तालुक्यातील १४ पैकी गुलाबवाडी, मोरव्हाल, कुसुंबा या पाझर तलावात १५ टक्के पाणीसाठा आहे. तसेच सहस्रलिंग, जानोरी, विवरा, पिंपरी, अहिरवाडी, मोहगण आणि जिन्सी येथील पाझर तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तालुक्यातील ६ पैकी जिन्सीच्या एका कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात क्षमतेच्या सुमारे ४० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जिन्सीचे अन्य दोन, अभोरा, पाल आणि तामसवाडी येथील केटीवेअर कोरडे आहेत. चिनावल जवळच्या गौरखेडा परिसरात काही कूपनलिकांचे पाणी आटले आहे.