भीमा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
सोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणातील पातळीत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता धरणात दौंड येथून ५३ हजार ९९० क्युसेकने पाणी येत होते. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढणार असल्याने भीमा नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरण व्यवस्थापनाच्या उपविभागीय अभियंत्यांनी लोकांना इशारा देण्याबाबतचे पत्र आज उजनी धरण व्यवस्थापनाच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे. भीमा नदीमध्ये यापूर्वीच वीर धरणातून सोडलेले पाणी आले आहे. त्यातच आता उजनी धरण ९० टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून धरणातून भीमा नदीमध्ये कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी नदीपात्रातून काढून घ्याव्यात. त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून कोणत्याही प्रकारचे दळणवळण करू नये, अशा सूचना उजनी धरण व्यवस्थापनाने दिल्या आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ६५.३९ टक्के झाला होता. दौंडबरोबरच बंडगार्डन येथील विसर्ग ३८ हजार ६०८ इतका होता. धरणातून कालव्यामध्ये तीन हजार, बोगद्यातून ९०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
शनिवारपर्यंत धरण होणार १०० टक्के पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शनिवारपर्यंत (ता. २५) १०० टक्के भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरण यंदा लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी ५२ टक्के पाऊस मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या सरासरी टक्केवारीत थोडीफार वाढ झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी ५२.१३ टक्के इतका पाऊस झाला आहे.