उजनी धरणात दौंडचा विसर्ग ६० हजार क्युसेक
सोलापूर : उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी येऊन मिसळत असल्याने धरणाची वाटचाल ८० टक्क्यांच्या दिशेने सुरू झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून धरणात दौंड येथून ६० हजार १६५ क्युसेकने पाणी मिसळत आहे. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ७३.७८ टक्के इतका झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे त्या धरणातून खाली पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा १०१.१८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ३९.५३ टीएमसी इतका झाला आहे. बंडगार्डन येथून ३६ हजार १७८ क्युसेकचा विसर्ग येत आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उजनी लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चंद्रभागेची पातळी वाढल्याने पुंडलिक मंदिर पाण्यात वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले आहे. मंगळवारी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेप्रमाणे गर्दी झाली. एवढी गर्दी होईल असा प्रशासनास अंदाज न आल्याने नियोजनाचा अभाव दिसून आला.
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. पुत्रदा एकादशीची पर्वणी साधण्यासाठी तीन लाखांहून अधिक भाविक आलेले आहेत. चंद्रभागेत स्नानासाठी देखील पहाटेपासून गर्दी होती. परंतु प्रशासनाने योग्य नियोजन केलेले दिसत नाही. अनेक रस्त्यांवर जागोजागी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली असून फेरीवाल्यांची गर्दी असते. वाहने रस्त्यांवर ठिकठिकाणी उभा करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागांत भाविकांना चालणे मुश्कील झाले आहे.