सोलापुरात अडीच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा
सोलापूर : ऑनलाइन सर्व्हर डाऊनची समस्या, सात-बारा उतारा मिळण्यातील अडचणीतूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.३१) दुपारपर्यंत जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी प्रीमियम भरला. गतवर्षीपेक्षा यंदा २५ हजार जादा शेतकऱ्यांनी विमा उतरवला.
अलीकडच्या तीन-चार वर्षांपासून खरिपातही पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्टर इतके निश्चित केले आहे; पण त्या तुलनेत आजअखेर १ लाख ६२ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याशिवाय उडीद, मुगाचा समावेश आहे. सोयाबीन आणि तुरीसाठी प्रीमियम भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी दुपारपर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. गेल्यावर्षी हीच संख्या २ लाख २५ हजार होती.
विम्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी आहे; पण यंदा सुरवातीपासूनच ऑनलाइन सर्व्हर डाऊन, सात-बारा उताऱ्यातील अडचणीमुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरली. गावात सात-बारा उतारा मिळवणे, पीकपेरा दाखला यांसारख्या कागदपत्रांसाठी तलाठ्याच्या मागे फिरण्याची वेळ आली. ऑनलाइन ई-सेवा केंद्रांनी तर शेतकऱ्यांची लूट केली.