जळगाव : जिल्ह्यात बोदवड, मुक्ताईनगर व जामनेरमधील विविध भागांमधील हलक्या जमिनीच्या भागात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत आहे. पुढील काळात पाऊस आला नाही तर कापसाचे पीकही हातचे जाईल की काय, अशी स्थिती आहे.
सोयाबीन, कापूस, मका या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु मागील १२ ते १३ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. मुक्ताईनगरमधील पूर्व व दक्षिण भाग, बोदवडमधील पूर्व व पश्चिम भाग आणि जामनेरातील पूर्व भागातील गावांमध्ये हलकी, मुरमाड जमीन आहे. या भागात जेवढा अधिक पाऊस असतो तेवढी जोमात पिके येतात. पाच- सहा दिवसही पाऊस झाला नाही तर पिकांच्या वाढीवर, फळे, फुले लावण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
मागील पाच- सहा दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यात हलक्या जमिनींमधील ओलावा लागलीच दूर झाला. उष्णता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण राहिले तर पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. पण ऊन असले तर पिके माना टाकतात. यातच या भागात कृत्रिम जलसाठ्यांची स्थिती बिकट आहे. त्यांना हवा तसा पाऊस यंदा मिळाला नाही. पीक जेमतेम तग धरून होते, त्यातच पुन्हा एकदा पाऊस गायब झाल्याने हळूहळू स्थिती बिकट बनत आहे.
या तालुक्यांमध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे. त्याची वाढ खुंटली असून, फुलगळ, पातेगळ सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृत्रिम जलसाठे आहेत त्यांनी सिंचन सुरू केले आहे. काही कापूस उत्पादकांकडे सूक्ष्म सिंचन प्रणाली असल्याने त्यांना सिंचन करणे सुकर आहे. परंतु सूक्ष्म सिंचन प्रणाली नसलेल्या शेतकऱ्यांना एक आड एक सरीत पट पद्धतीने सिंचन करावे लागत आहे.
आमच्याकडे पिकांची स्थिती सुरवातीपासून नाजूक आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. कापसाचे पीक माना टाकू लागले आहे. पावसाची नितांत गरज आहे, अशी माहिती बोदवड येथील शेतकरी नाना पाटील यांनी दिली.