ऊस उत्पादनवाढीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य द्या
सोलापूर : "ऊस उत्पादनवाढीमध्ये पाणी व्यवस्थापनाला महत्त्व आहे, पण त्याहीपेक्षा अधिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे,'' असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. बी. एस. कदम यांनी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे व्यक्त केले.
‘ॲग्रोवन' आणि स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लि. पुणे यांच्या वतीने आयोजित ॲग्रोसंवादमध्ये ‘ऊस उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. कदम बोलत होते. सरपंच मुन्ना कुडले, प्रकाश पुजारी, स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लि. पुणेचे विक्री व्यवस्थापक विश्वजित पाटील, व्यवस्थापक विशाल इनामदार, बसवराज हविनाळे, दाऊद पटेल, सिद्धराम सोनार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, "ऊस लागवडीपूर्वी जमिनीची प्रत, त्याचा कस तपासण्यासाठी मातीपरीक्षण महत्त्वाचे आहे. त्यात मुख्यतः सामू, क्षारांचे प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब किती आहे, हे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार ऊस लागवड नियोजन फायदेशीर ठरेल. उसाचे बेणे शुद्ध आणि गुणवत्तेचे घ्यावे, त्याची बेणेप्रक्रिया करावी, तसेच एक किंवा दोन डोळे पद्धतीची टिपरी वापरून लागवड करावी. चार ते साडेचार फुटांपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार सरी पाडून घ्यावी.’’
‘‘आंतरपिके विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार घ्यावीत, तणनाशकाचा वापर केल्यास खुरपणी, मशागतीचा अतिरिक्त खर्च वाचेल. उसाची एकरी संख्या ही किमान ५० ते ५५ हजारांपर्यंत असावी, तरच उत्पादकता चांगली मिळू शकेल. पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, पण उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळबांधणी ते मोठी बांधणी आणि काढणीपर्यंत त्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. पण सेंद्रिय आणि रासायनिक असा दोन्हींचा समान पद्धतीने वापर करावा.''
डॉ. कदम यांनी खोडवा व्यवस्थापनावरही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘ॲग्रोवन’चे क्षेत्रिय प्रतिनिधी संदेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विशाल इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद मुंडे यांनी आभार मानले.