पावसाळ्यामध्ये गढूळ अस्वच्छ पाणी, दलदल, चिखल यामुळे रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे अस्वच्छ पाण्यातून, वाऱ्याद्वारे पक्ष्यांमध्ये या रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. जर खाद्याची पोती पडदे म्हणून लावली असतील, तर ही पोती भिजून ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होते. तसेच, पाण्यामुळे पक्ष्यांच्या खाद्याच्या भांड्यांतील ओले झालेल्या खाद्यामध्ये बुरशीची वाढ होऊन पक्ष्यांमध्ये बुरशीजन्य आजार उद्भवतात.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे व कमी सूर्यप्रकाशामुळे शेडमधील साहित्य कोरडे राहत नाही. वातावरण दमट अाणि रोगट बनते. पाणी शेडमध्ये येऊ नये म्हणून पडदे लावल्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहत नाही. त्यामुळे अमोनिया, मिथेनसारखे वायू साठून राहतात व त्यामुळे परजीवीजन्य आजार व श्वसनाचे आजार पक्ष्यांमध्ये उद्भवतात.
पावसाळ्यामध्ये शेडभोवती दलदल होऊन डास व माश्यांचे प्रमाण वाढते. यामुळेही पक्ष्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूषित, अस्वच्छ पाण्यामुळे पक्ष्यांमध्ये ई-कोलायचा प्रादुर्भाव वाढतो.
उपाय योजना
शेडला खाद्याची पोती पडदे म्हणून न लावता, शेडमध्ये पाणी येऊ नये म्हणून प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. शेडमधील वायुविजन व्यवस्थित राहण्यासाठी, तसेच शेडमधील हवा खेळती राहण्यासाठी पाऊस बंद असताना दुपारच्या वेळी थोडा सूर्यप्रकाश असतो, त्या वेळी पडदे उघडावेत. शेडमधील गादी (लीटर) कोरडी व सुटसुटीत राहण्यासाठी दिवसातून २ ते ३ वेळा गादी खाली-वर करावी. गादीच्या साहित्यात ओलावा वाटत असल्यास थोडा चुना किंवा नवीन गादीचे साहित्य मिसळावे. पक्ष्यांना गढूळ पाणी न देता स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे. रक्ती हागवणीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खाद्यामध्ये कॉक्सीडिओस्टॅट औषधे वापरावीत. पावसाच्या पाण्याची गळती होऊन लीटर भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पक्ष्यांचे जंतनिर्मूलन करून घ्यावे. शेड उंचावर असावे व शेडभोवती खड्डे पडून पाणी साठून दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी.
संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३
(पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)