जमिनीची प्रत लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने शेततळ्याचे खोदकाम करावे.
शेततळ्याची जागा निवडताना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये, कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावीत. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल या प्रमाणे वळवावे.
पावसाच्या पाण्याचे योग्य रितीने व्यवस्थापन केल्यास जिरायती शेतीमधील अडचणीवर थोड्या फार प्रमाणात मात करता येते. राज्यातील बऱ्याचशा जिरायती जमिनी या काळ्या मातीच्या आहेत. या मातीवर पडणारे पावसाचे पाणी हे जास्त प्रमाणात वाहून जाते. साधारणतः हे प्रमाण पडणाऱ्या पावसाच्या ३० टक्क्यांपर्यंत असते. असे हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी शेततळे फायदेशीर ठरते. शेततळे नाला ओघळीचे काठावरील पडक्षेत्रात घेतले जाते. शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी दिल्यास हमखास पीक येते. जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही. तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी शेततळे तयार करून पाणी साठवावे.
शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. खोलगट, दलदलीची आणि शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी.जागा निवडताना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये, कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावीत. मजगी गटाच्या वरील खाचराच्या ठिकाणी/ जवळ शेततळ्यासाठी जागा निवडावी. सभोवतालची जमीन चिबड होईल, अशा ठिकाणी शेततळे खोदू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण ३ टक्क्यांपर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळे खोदावे. शेततळ्याची जागा निवडीचे तांत्रिक निकष
शेततळे ही योजना कृषी विभागामार्फत पाणलोटाचा उपचार म्हणून पूर्वीपासूनच राबविण्यात येत असल्याने या योजनेच्या तांत्रिक बाबी आणि जागेच्या निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असावेत.ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमीन ज्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असतात.मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट अशी जमीन असलेली जागा निवडू नये.ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्केपर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळे खोदावे.मागणी केलेल्या आकारमानाचे शेततळे लाभार्थ्यांच्या स्वतःच्याच शेतात बसेल आणि चारही बाजूने किमान १० फूट जागा राहील अशीच जागा निवडावी.नाला किंवा ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेऊ नये.सर्व प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात येऊ नयेत.पर्जन्यमान व स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार कमीत कमी १००० घ.मी. पाणी वरील पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणार असेल अशाच ठिकाणी शेततळे घेण्यात यावे. पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असावे.सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होतील, शेततळ्यातून पाणी पासरून लगतच्या शेतकऱ्यांच्या स्थावर/ जंगम मालमत्तेचे नुकसान होईल असा ठिकाणी शेततळे घेऊ नये.शेततळ्यात करावयाचा पाणीसाठा अपधावेतून उपलब्ध होण्यासाठी संबंधित तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाचा विचार करावा. - डॉ. मदन पेंडके : ९८९०४३३८०३ ( अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)