पूरग्रस्त द्राक्षवेलीची मुळे कार्यरत करण्याकडे लक्ष द्यावे  
ॲग्रो गाईड

पूरग्रस्त द्राक्षवेलीची मुळे कार्यरत करण्याकडे लक्ष द्यावे 

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय 

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष विभागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस व पूर स्थितीमुळे काही बागांमध्ये बागेच्या वर ५-८ फूट पाणी राहिले. या बागा जवळपास १०-१२ दिवस पाण्यात बुडलेल्या होत्या. बागेतून पाणी निघून गेल्यानंतरची परिस्थिती दयनीय होती. काही बागेत पानगळ झाली, तर काही बागेत पानांवर माती जमा झाली. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी शुक्रवारी (ता. १६) या भागामध्ये द्राक्षबागांची पाहणी केली. यानंतर पुन्हा सोमवारी (ता. २६) द्राक्षबागांमध्ये पुरांच्या नेमक्या परिणामांची पाहणी केली. आढावा घेतला. त्यानुसार या बागांमध्ये करावयाच्या व्यवस्थापनाची माहिती घेऊ.  १) बोदावर गोळा झालेला गाळ ः  वाळवा व पलुस तालुक्‍यांतील द्राक्षबागांच्या पाहणीमध्ये बागांमध्ये नदीतून आलेल्या पाण्यासोबत आलेला गाळ जमा झाल्याचे दिसले. जवळपास २-३ इंच जाडीचा गाळमातीचा थर बोदावर व बागेत दिसून आला. पुढील काळात जसजसे ऊन पडू लागेल, तसे या मातीवर भेगा (चिरा) पडतील. या चिकणी माती किंवा सिल्ट स्वरूपातील मातीच्या थरामुळे बोदामध्ये ओलावा जास्त काळ टिकेल. मात्र, त्यामुळे जमिनीच्या मुळातील कक्षेत हवा खेळती राहणार नाही. मुळांना कार्य करणे कठीण होईल. अशा या परिस्थितीतील द्राक्षबागेत बोदावरील माती मोकळी करावी. जुनी व नवीन माती खालीवर केल्यास त्याचे चांगले परिणाम मुळीच्या कार्यक्षमतेवर होतील. ज्या बागेत मुरम होता अशा बागेत ही माती फायद्याची ठरू शकते.  काही बागेत जास्त पावसामुळे बोद घट्ट झाल्याचे दिसले. कडक झालेल्या या बोदामुळे मुळे कार्यरत नसतात. बोद ओले असलेल्या परिस्थितीत बागायतदारांनी पहारीचा वापर करून बोदावर ड्रिपरच्या खाली लहान खड्डा तयार केला. त्यामध्ये अन्नद्रव्य टाकलेले दिसले. बोद ओला असताना तयार केलेला खड्डासुद्धा आतील बाजूने प्लॅस्टर केल्याप्रमाणे कडक होईल. यामुळे त्या खड्ड्यात टाकलेले अन्नद्रव्य मुळांपर्यंत पोचणे अवघड राहील. अशा परिस्थितीत बागेत या पद्धतीचा वापर थांबवावा. या वेळी बोदामध्ये ओलावा जास्त प्रमाणात असल्यामुळे मुळे फार कार्यक्षम नाही. त्यामुळे या खतांचा फारसा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा बोद वाफसा परिस्थितीत आल्यानंतर लगेच कुदळीच्या साह्याने मोकळे करून घ्यावेत. या वेळी बोद मोकळे केल्यानंतर नत्र व स्फुरद गटातील खते फक्त द्यावीत.  २) फुटी निघण्याची परिस्थिती ः  ज्या बागेत द्राक्षवेलीच्या काड्या जास्त काळ पाण्यात डुबल्या होत्या, अशा बागेमध्ये काडीवरील डोळे लवकर फुटले आहेत. यामध्ये बारीक डोळा लवकर फुटला तर जाड काडीवरील डोळा नुकतीच फुटायची सुरवात झाल्याचे सर्वेक्षणात दिसले. यामुळे पुढील काळात घडाच्या विकासाकरिता आवश्‍यक त्या संजीवक वापराच्या वेळी (उदा. जीए३ ची पहिली फवारणी) अडचणी येतील. ही परिस्थिती टाळण्याकरिता हायड्रोजन सायनामाईडचा वापर ४० मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे करावा. तर जाड काडीस पुन्हा एकदा पेस्टिंग करून घ्यावे. बागेमध्ये काही ठिकाणी डोळे कापसत असल्याची स्थिती असल्यास हायड्रोजन सायनामाईडची फवारणीसुद्धा फायद्याची ठरेल.  ३) द्राक्षघड निघण्याची परिस्थिती व नियोजन ः  ज्या बागेत पानगळ पूर्ण झाल्यामुळे लवकर फळछाटणी घ्यावी लागली, अशा बागेत द्राक्षघड कसे निघतील अशी शंका होती. परंतु, काडीवरील डोळे फुटल्यानंतर निघालेला द्राक्षघड हा पूर्वीसारखाच दिसत होता. नवीन फुटीवर निघालेल्या द्राक्षघडांचा आकार जरी या वेळी साधारण असला तरी पुढील काळात या घडाचे संगोपन करणे महत्त्वाचे असेल.  जमिनीतील मुळे ज्या प्रमाणात कार्यरत असायला हवीत, तसे दिसत नाहीत. पूर्ण पानगळ झाल्यामुळे डोळे लवकर फुगले असून, फुटीसुद्धा बाहेर आल्याची परिस्थिती काही बागांमध्ये दिसली. अशा नवीन फुटीस आवश्‍यक असलेले अन्नद्रव्य वेलीमधून वापरले जाईल. वेलीतील साठवलेले अन्नद्रव्ये संपण्यापूर्वी जमिनीत किंवा बोदामधील मुळे कार्यरत होणे गरजेचे आहे.  या बागेत महत्त्वाचे म्हणजे यावर्षी वेलीवर द्राक्षघडांची संख्या शिस्तबद्ध असणे गरजेचे असेल. वेलीमध्ये स्टोरेज कमी असल्याचे दिसून आले. पुढील काळात जरी अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तरी दोन्हींचा ताळमेळ बसवून घेतल्यास घडाचा विकास चांगला होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Industrial Development: नवीन मोठ्या उद्योगांसह प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण: मंत्री छगन भुजबळ

ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल

Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

SCROLL FOR NEXT