rice nursery
rice nursery 
ॲग्रो गाईड

रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजन

डॉ. प्रशांत बोडके, वैभव राजेमहाडिक, डॉ. व्ही. जी. मोरे

चटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीस पुरेशी होतात. रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्‍क्‍या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो.

बहुतांश शेतकरी हे स्वतःकडे उपलब्ध भात बियाणे किंवा   नवीन बियाणे विकत घेऊन धूळवाफ पद्धतीने नियमित मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी रोपवाटिकेची पेरणी करतात. यावर्षी निसर्ग वादळ आणि अतिपर्जन्यमान यामुळे धूळवाफा पद्धतीने पेरणी केलेले काही भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत कमी कालावधीत भात रोपवाटिका तयार करावी.सद्यःस्थितीत पाणथळ भागात भात खाचरातील पाण्याची पातळी लक्षात घेता नवीन रोपवाटिका करणे शक्‍य न झाल्यास त्याला पर्याय म्हणून चटई किंवा रहू पद्धतीने भात रोपवाटिका तयार करावी. चटई रोपवाटिका

  • भात रोपवाटिका पूर्णपणे निरुपयोगी झाली असल्यास चटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करण्यास घ्यावी. या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील.
  • चटई रोपवाटिका शेतकऱ्यांना घराच्या पडवीतही करणे शक्‍य आहे. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीस पुरेशी होतात. 
  • रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्‍क्‍या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो. रोपवाटिकेसाठी १.२० मी. रुंद व १०० गेजचा प्लॅस्टिकचा कागद वापरतात. एक गुंठा रोपवाटिका तयार करण्यासाठी साधारणपणे २.५ ते ३ किलो कागद लागतो. 
  • पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लॅस्टिकला छिद्रे पाडावीत. सदर प्लॅस्टिक कागद ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करावयाची आहे अशा ठिकाणी पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विटा किंवा बांबूच्या साहाय्याने उचलून घ्याव्यात. 
  • तयार झालेल्या वाफ्यामध्ये माती व शेणखत ६०ः४० या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि १ इंच उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या मध्ये भरावे. माती व शेणखत मिश्रण फ्रेममध्ये टाकण्यापूर्वी ५ मि.मी.च्या चाळणीमधून चाळून घ्यावी. त्यामुळे मातीमधील खडे वेगळे होतात. 
  • प्लॅस्टिक कागदावर शेणखतमिश्रित माती टाकून झाल्यानंतर झारीने पाणी शिंपडून माती ओली करून घ्यावी. हलकासा दाब द्यावा. 
  • अशा वाफ्यावरती रहू पद्धतीने म्हणजेच २४ तास पाण्यात भिजवून नंतर ३६ ते ४८ तास पोत्यामध्ये बियाणे ठेवून मोड आलेले बियाणे ५०० ग्रॅम प्रति चौ. मी. या दराने फेकून पेरावे. या नंतर चाळलेल्या शेणखतमिश्रित मातीने हलकेसे झाकावे. 
  • सुरुवातीला २ ते ४ दिवस हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने पाणी फवारून द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे.
  • रोपांच्या जोमदार वाढीसाठी चटई रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी प्रति चौ.मी.साठी २० ग्रॅम डायअमोनियम फॉस्फेट शेणखत, माती मिश्रणात मिसळून द्यावे. 
  • रोपे साधारण १२ ते १५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपांची संख्या जास्त असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही जर झाल्यास हाताने तणे उपटून घ्यावीत. 
  • तयार झालेली रोपे रोपवाटिकेतून प्लॅस्टिक रोल करून किंवा हव्या त्या आकारामध्ये वाफे कापून मुख्य शेतावर जेथे लावणी करावयाची आहे अशा ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो.
  • जर लावणी यंत्राच्या साहाय्याने करावयाची झाल्यास ८ इंच रुंदीच्या रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणी यंत्रात वापरता येतात. 
  • एक चौरस मीटरवर घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेसे होतात, म्हणजेच एक हेक्‍टर क्षेत्रासाठी एक गुंठा क्षेत्र रोपवाटिकेसाठी पुरेसे आहे.
  • पीक व्यवस्थापन 

  • साधारणपणे १२० दिवसांपेक्षा कमी कालावधीत तयार होणाऱ्या भात जातीमध्ये, पावसाचा खंड पडल्याने रोपांचे वय वाढून फुटव्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे. अशा भात जातींची पुनर्लागवड प्रचलित पद्धतीपेक्षा जवळ म्हणजेच १५ बाय १५ सेंमी अंतरावर करावी. प्रति चूड दोन ते तीन रोपांऐवजी चार ते पाच रोपे वापरावीत. तसेच नत्र खताची २५ टक्के जादा मात्रा द्यावी. 
  • नाचणी, वरी लागवड करावी. नाचणी पिकामध्ये मूग व उडीद ही पिके आंतरपिके घ्यावीत. 
  •  उशिरा पावसामुळे वरकस भागात भात पीक घेणे शक्‍य नसेल तेथे झेंडू, भेंडी, गवार, काकडी, शिराळी, पडवळ, कारली, दुधी इ. लवकर तयार होणारी फुलपिके आणि भाजीपाला पिके घ्यावीत. 
  • ज्या ठिकाणी संरक्षक सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी भुईमूग लागवड करावी. 
  • रहू पद्धतीने भात लागवड  

  • लागवडीसाठी रोपे कमी पडल्यास रहू पद्धतीने लागवड करणे योग्य ठरते. रहूसाठी ८० ते १०० किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. रहू तयार करताना भात बियाणे गोणपाटात बांधून २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे पाण्यातून बाहेर काढून २४ तास गोणपाटाच्या खाली-वर सुका पेंढा ठेवून त्यावर पाणी मारावे. 
  • अशा प्रकारे तयार केलेला आणि नुकताच मोड फुटलेला ४८ तासांचा रहू पेरणीसाठी वापरावा. 
  • चिखलणी केलेल्या क्षेत्रावर सुरुवातीची खताची मात्रा दिल्यानंतर रहू शक्‍यतो २२.५ सें.मी. अंतरावर ओळीत पेरावा. ओळीत पेरणे शक्‍य नसेल अशा वेळी रहू फेकून पेरावा.
  • डॉ. प्रशांत बोडके,८२७५२०११३०

    (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT