गाळमातीची तपासणी करून घ्यावी.
हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळमाती वापरण्यास प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळमाती वापरण्याची मात्रा निश्चित करावी. त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.
जास्त तीव्रतेच्या पडणाऱ्या पावसामुळे मातीचे कण मोकळे होऊन, पाण्याच्या प्रवाह बरोबर पाणी साठवण, यांत्रिकी मृद व जल संधारण पद्धतीत जमा होतात. अशा प्रकारे सतत गाळ साठत असल्यामुळे पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी, लघू व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादींची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे मृद व जलसंधारण कामांची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत आहे; परंतु या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ही गाळ माती पिकांच्या वाढीसाठी उपयोगाची आहे. गाळमाती वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येते तसेच तिची ओलावा, साठवण क्षमतासुद्धा पूर्ववत करता येते. अशा गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती परत जमिनीत मिसळल्यामुळे त्यांचा परत पिकास चांगला उपयोग होतो. हे लक्षात घेता पाणी साठवण पद्धतीतील गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्या आणि मध्यम जमिनीत मिसळावा. गाळ काढल्यामुळे साठवण प्रकल्पाची कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत करता येते.
फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी गाळमाती वापरतात किंवा उथळ हलक्या जमिनीत सुपीकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात. गाळमाती वापरताना तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास केला जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गाळमाती वापरताना निरनिराळ्या प्रमाणात, शेताची गरज, जमिनीचा मगदूर, शेती सुपीकतेचा विचार न करता वापरली जाते. त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळ मातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो. गाळमातीची मर्यादित उपलब्धता वाढवण्यासाठी, प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून, गाळ मातीचा वापर करावा. गाळमाती वापरण्याची मात्रा
शेतात मिसळण्याच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथःकरण करावे. त्यातील चिकणमातीचे प्रमाण अजमावणे महत्त्वाचे आहे. गाळमातीची मात्रा निर्धारित करण्यासाठी (www.cridaernet.in) सूत्र विकसित करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल, मे महिन्यात गाळमाती मिसळावी. गाळमातीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही प्रमुख अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जमिनीचे भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते. गाळाची माती वापरल्यामुळे रासायनिक खत वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा साठविण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे. गाळमातीचा वापर उथळ व मध्यम खोलीच्या जमिनीत केला असता, त्यातील पोषक अन्नद्रव्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते. पीक उत्पादनात शाश्वतता येते. गाळमातीच्या वापरामुळे पडीक जमिनीसुद्धा पीक लागवडीखाली आणता येतात.त्यापूर्वी गाळमातीची प्रत व प्रमाण निश्चित करावे. सोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या गाळमातीच्या प्रात्यक्षिकातून रब्बी ज्वारीच्या धान्य व कडबा उत्पादन आणि ओलावा वापर क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. गाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी
गाळमाती वापराचा चांगला परिणाम साध्य करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी. हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळमाती वापरण्यास प्राधान्य यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळवापर मात्रा निर्धारित करावी, त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल. सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात साठवण पद्धतीतील पाणी आटते. त्याचवेळी गाळमाती साठवण पद्धतीतून बाहेर काढावी. ही गाळमाती शेतात पसरावी.पाच वर्षातून एकदा साठवण पद्धतीतील शेतात गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.गाळमातीत जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात मूलस्थानी जलसंधारण पद्धतीपैकी जमिनीच्या मगदुरानुसार व उतारानुसार बंधिस्त वाफे, सपाट वाफे व सरी वरंबे करून त्या शेतात रब्बी हंगामातील पिकांची लागवड करावी. हलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करताना खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोडून त्यामध्ये गाळमाती भरावी, तत्पूर्वी गाळमातीची प्रत तसेच शेतातील मातीची तपासणी करणे आवश्यक. गाळमातीचा सामू ८.५ पेक्षा जास्त आणि २.५ डेसिसायमन प्रतिमीटर जास्त असल्यास शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदून शेतात पसरू नये. चांगल्या प्रतीची गाळमाती बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेती कामासाठी वापरू नये. चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळमातीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो. पिकाची उत्पादकता घटते.गेल्या ६५ वर्षाच्या काळात, ४५ सें.मी.पेक्षा जास्त खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ४६ टक्क्यांवरून २९ टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर ४५ सें. मी. पेक्षा कमी खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ७१ टक्क्यापर्यंत झाले आहे.प्रतिवर्षी काळ्या जमिनीतून गाळाच्या रूपाने वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण ५२ टनांपर्यंत आढळून आले आहे.साधारणपणे १ सें.मी. जाडीचा थर गाळाच्या रूपाने वाहून जाण्यास २६ ते ५१ वर्ष लागतात. परिणामी जमिनी निकृष्ट बनून तिची उत्पादन क्षमता कमी होते. - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि.नगर)