सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज शक्य आहे.
जलसंधारण उपाय म्हटले, की डोळ्यासमोर पटकन येतात ते कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि चेक डॅम. अशा बंधाऱ्यात पाणी आडलेले दिसते. जलसंधारण यशस्वी झाल्याची भावना काही काळ तरी निर्माण करायची ताकद या प्रकारच्या उपायांमध्ये असते. त्यामुळे कोणताही नाला, ओढा, लहान किंवा मोठ्या नदीवर या पद्धतीचे बंधारे राज्यात सर्व ठिकाणी बांधले जातात. अशा बंधाऱ्यांची सद्यःस्थिती पाहिली तर लक्षात येते, की या प्रकारच्या बहुतांश बंधाऱ्यांची अवस्था गाळ साठल्याने बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी या बंधाऱ्यांची भिंत मोडकळीला आलेली आहे. काही ठिकाणी बंधाऱ्याच्या तळातून पाणी निघून जाताना दिसते. याचा अंतिम परिणाम म्हणजे हे उपाय योजूनही आपल्याला हवे तेव्हा, म्हणजे उन्हाळ्यात बहुतांश बंधाऱ्यामध्ये पाणी नसते. हे का होतं आणि यावर काही उपाय आहे का आणि ते कोणते? हे आपण माहिती करून घेऊयात.
चुकीच्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम अनेक ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार बंधाऱ्याची जागा निश्चित केली जाते, जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण यामुळे तो बंधारा अनेकदा चुकीच्या जागी बांधला जातो. मग तो साठवणुकीचा बंधारा न होता पाझर तलावाचे काम करतो. अशा बंधाऱ्यात उन्हाळ्यात पाणी दिसत नाही. बऱ्याच वेळेला अशा बंधाऱ्यांची उंची जमिनीपासून ६ ते ७ फुटांपेक्षा जास्त नसते. आपल्याकडे असलेल्या बाष्पीभवनाचा विचार आणि गणित केले तर लक्षात येते, की वर्षभरात सुमारे दीड मीटरपेक्षा जास्त पाणी वाफ होऊन उडून जाते. त्यामुळे आपल्याला वापरण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याच्या क्षमतेच्या जवळपास निम्म्या क्षमतेचा साठा करणे शक्य होते, जो आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी पडू शकत नाही. अनेकदा, बंधारा बांधताना केलेल्या काही चुका, त्रुटी आणि अंमलबजावणीत झालेल्या गफलती यांचा थेट परिणाम बंधाऱ्याच्या दर्जावर होतो. त्यामुळे पाणी साठण्यापेक्षा वाहून जाणे जास्त अनुभवायला मिळते.
ओढ्याची उंची जेव्हा ओढ्याच्या दोन्ही किंवा एखादी बाजू पुरेशी उंच नसते, तेव्हा तिथे बंधाऱ्याची उंची फारशी घेता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी जरी उत्तम साठू शकत असले तरी त्याचा फार काळ उपयोग करून घेता येणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी असलेले बंधारे फक्त पाण्याचा वाहण्याचा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. काही काळ पाण्याचा वेग कमी झाल्याने काही प्रमाणात पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरण्याची शक्यता वाढते. अशा अनेक कारणांमुळे बहुतांश ठिकाणी बांधलेले बंधारे एक तर गाळाने भरतात किंवा पाणी वाहून किंवा बाष्प होऊन उडून गेल्याने कोरडे पडलेले दिसतात. अशा बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि बळकटीकरण करणे हा एक चांगला आणि कमी खर्चात होणारा उपाय होऊ शकतो. कारण, असे बंधारे बांधताना खर्च झालेला असतो, ती जागा उपायासाठी वापरली असते, त्यामुळे ती जागा सोडून दुसरीकडे काही उपाय करायचा म्हटले तर आधी केलेला खर्च आणि जागा दोन्ही वाया जाते. त्यामुळे शक्य असेल तर अस्तित्त्वात असलेला बंधारा दुरुस्त करणे हा सर्वात उपयुक्त ठरणारा उपाय आहे.
बंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण
- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०,
( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.