Rural Life
Rural Life Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Life : पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती, हे खरे नाही...

Team Agrowon

नीरज हातेकर

भारतातील खेडी स्वयंपूर्ण वगैरे नव्हती. पावसाळ्यानंतर शेतीत (Agriculture) काहीच काम नसायचे. खरीप पीक वर्षभर पुरत नसे. मग पावसाळ्यानंतर जगण्यासाठी बाहेर पडायला भाग पडे. यालाच मुलूखगिरी म्हणतात. दसऱ्याला बाहेर पडले की पावसाळ्याच्या तोंडावरच घरी येणे शक्य असे, असली परिस्थिती होती.

बलुतेदार वगैरे परंपरागत त्याच त्याच वस्तू निर्माण करत. बलुतेदारी ही जातीची चौकट होती. त्यांच्या कामात बदल फार थोडा होत असे. मोठ्या, उत्पादक अशा तांत्रिक सुधारणा झाल्या नाहीत. म्हणूनच विसाव्या शतकात मिक्सर ग्राईंडर वगैरे वस्तूंचा वापर सुरू झाल्यावर बलुतेदार लोकांच्या पोटावर पाय आला.

पैशाचा, म्हणजे चलनाचा वापर जवळपास सार्वत्रिक होता. पैशाशिवाय कोणतीच अर्थव्यवस्था नसते. चलनामुळे व्यवहार शक्य होतात. समजा माझ्याकडे एक किलो भात आहे आणि मला त्या बदली अर्धा किलो ज्वारी हवी आहे तर मग मला अर्धा किलो ज्वारी बदलून एक किलो भात घ्यायची तयारी असलेली व्यक्ती भेटल्याशिवाय व्यवहारच होणार नाही. म्हणूनच प्रत्येक समाज आपापले चलन शोधून काढतो.

भारतातील खेड्यांमध्ये अनेक तऱ्हेची चलने प्रचलित होती. मुघल काळात निरनिराळ्या चलनातील विनिमय दर बऱ्यापैकी स्थिर राहिला, पण अठराव्या शतकात गोंधळ सुरू झाला. नवीन निर्माण झालेली निरनिराळी राज्ये आपल्या नाण्यातील धातूचे प्रमाण वाटेल तसे कमी करू लागले. त्यांना कमी खर्चात जास्त पैसे निर्माण करायचे असतं. त्यामुळे अठरावे शतक मौद्रिक गोंधळाचे शतक होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ मध्ये हे उत्तम मांडले आहे. भारतात खेडी स्वयंपूर्ण होती आणि तेथे व्यवहार होण्यास चलनाची गरज नव्हती ही ब्रिटिश काळात शिजलेली लोण कढी आहे. यावर ideologies of the Raj हे सुंदर पुस्तक पाहावे. महाराष्ट्रापुरते आकडेवारी आणि पुराव्याने हे सिद्ध करणारा माझा एक लेख past and present या नियतकालिकाच्या २००३ च्या एका अंकात मिळेल.

खेड्यातील सगळी माणसे सर्वथा सुखी, आनंदी वगैरे नव्हती. विशेषतः लहान मुले आणि बाळंतपणात स्त्रिया दगावण्याचे प्रमाण खूपच होते. बरीच मुले दगावत म्हणून जन्माला पण बरीच घालावी लागत असत. खूप मुले जन्माला येत, पण खूप मुले आणि माणसे लवकरच दगावत, त्यामुळे लोकसंख्या स्थिर होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुले दगावण्याचे आणि माणसे मरण्याचे प्रमाण कमी झाले (साथीचे आजार, दुष्काळ वगैरे काहीसे आटोक्यात आले). पण जन्माला घालण्याचे कमी झाले नाही. म्हणून लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यापूर्वी खूप जन्म आणि खूप मृत्यूमुळे लोकसंख्या जवळपास स्थिर होती.

वस्त्रोद्योग भरभराटीला आला होता, तरी खेड्यातील लोकांना साधेच कपडे परवडत असत, ते पण जेमतेम. खेड्यातील काही मोजकीच संपन्न माणसे हे कपडे खरेदी करू शकत होते. साथीचे आजार, दुष्काळ कायमच असत. लढाया, निरनिराळ्या सैन्याकडून लूटमार, जाळपोळ, वेठबिगार हे नेहमीच होत असे. सगळ्या धर्मांचे सैनिक हे उद्योग करत असत. त्यामुळे पैसे सांभाळून, लपवून ठेवले जात.

पैसे कोणाच्या नजरेत येऊ नयेत याची काळजी घेतली जात असे. जिथे पैशाचा भांडवल म्हणून वापर करता येत नाही, ते भिंतीत दडवून ठेवावे लागतात, तेथे आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य येत नाही. एकूण खेड्यात सुस्थिती वगैरे नव्हती. जी काही सुबत्ता आली ती मोठी बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय आणि बहुसांस्कृतिक प्रवाह यामुळे आली. जेव्हा अशा संधी निर्माण झाल्या तेव्हा लोकांनी परंपरागत चौकट फेकून देऊन या संधीचे स्वागत केले आणि सोने सुद्धा केले. अठराव्या शतकातील भारताचा जगाच्या औद्योगिक उत्पन्नात २५ टक्के वाटा असण्यामागे, उत्तम कलाकुसरीची भांडी, उंची वस्त्रे, तऱ्हतऱ्हेचे खाद्यपदार्थ हे किमान

काही लोकांना उपलब्ध असण्यामागे बहुसांस्कृतिक समाजाचा स्वीकार करण्याची वृत्ती आणि जगाशी जोडल्या गेल्यामुळे उपलब्ध झालेली बाजारपेठ ही महत्त्वाची कारणे होती. इथे परकीयांच्या द्वेष नव्हता, तर स्वीकार होता. भारताचा इतिहास हा धार्मिक लढायांचा, परकीय आक्रमणे आणि देशी लोकांनी केलेला प्रतिकार इतकाच मर्यादित आहे ही इंग्रजांनी मारलेली दुसरी लोण कढी आहे.

आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक चांगल्या, अभिमान बाळगावा अशा बाबी आहेत. त्यांचा अभिमान नक्कीच वाटला पाहिजे. पण आमच्याकडे सगळेच उत्तम होते, जगाकडून आम्हाला काहीच शिकण्यासारखे नाही, आम्हीच त्यांना सगळं काय ते शिकवू, एकदा का त्या पुराण काळात परत गेलो, की आपण जगज्जेते होऊ, विश्‍व गुरू होऊ, हा वृथाभिमान खड्ड्यात पाडणार. ज्या म्हाताऱ्या माणसांच्या डोक्यात ही भंकस फिट्ट बसली आहे त्यांच्याबाबत काहीच करू शकतं नाही, पण तरुणांनी आता या म्हाताऱ्या लोकांना रिटायर करायचीय वेळ आली आहे.

(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT