Wild Vegetables
Wild Vegetables  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

नीलिमा जोरवर

पावसाची जादू झाली आणि परीकथेतील नीलपरीने तिची जादुई छडी फिरवावी तसे सृष्टीचे रंग रूप पालटले. ‘किती महत्त्वाचा आहे पाऊस जीव-जंतूसाठी आणि ज्या मातीतून इतके जीव जन्म घेतात, ती जिवंत मातीदेखील जपली पाहिजे,’ असा विचार मनात घोळत राहिला.

पावसाळा आला की सगळ्यांना वेध लागतात ते रानभाज्यांचे (Wild Vegetables). नदी-नाले दुथडी भरून वाहतात, तेव्हा जमिनीला फुटलेल्या या हिरव्या अंकुरात गवत, वनस्पती आणि रानभाज्या उगवू (Healthy Wild Vegetables) लागतात. रानभाज्या म्हणजे काय? (What Is Wild Vegetables) तर अशा भाज्या की ज्या उगवण्यासाठी विशेष कोणती मेहनत घ्यावी लागत नाही, खत-पाणी द्यावे लागत नाही. तरीही मोकळ्या जागेवर, बांधावर, शेतात, रस्त्याच्या कडेला, डोंगर उतारावर, नदीच्या काठावर तर कधी नदीच्या प्रवाहात देखील त्या उगवलेल्या असतात. कधी कधी या रानभाज्या एखाद्या वृक्षावर देखील उगवलेल्या दिसतात. आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा अनेक वनस्पतींनी भरलेला आहे. त्यात जवळ जवळ १० हजार वनस्पतींचा वापर माणूसप्राणी अनेक कारणांसाठी करत आलेला आहे. जसे की औषधांसाठी, घरे-रस्ते बांधण्यासाठी, कागद, हत्यारे बनवण्यासाठी वगैरे वगैरे. एकूणच काय तर माणसाच्या जगण्यातून झाड वजा केले तर माणसाचे अस्तित्वच धोक्यात येईल.

माणसाचे अन्नदेखील मोठ्या प्रमाणात वनस्पतीकडून येते. उपलब्ध माहितीनुसार ३५०० वनस्पती या खाद्य म्हणून वापरात होत्या. आज आपण आपल्या आहारातील वनस्पतींची संख्या मोजली तर ती शंभरच्या आत असावी. मग या वनस्पती ज्या खाद्य आहेत, ज्या अपोआप उगवतात त्या काय फक्त आदिमानव खात होते का? तर असे नक्कीच नाही.

अगदी आता-आतापर्यंत म्हणजे ६० वर्षांपूर्वी भारतात आणि त्याही जगभरात यांचे सेवन केले जात होतेच की. आजही आदिवासी भागांत त्यांचा वापर होतोच. पण त्यांची संख्या कमी झाली आहे, हे निश्‍चित. मग ज्या काही उरल्या-सुरल्या रानभाज्या आहेत, त्या ओळखायच्या कशा? अनेकांना प्रश्‍न पडतो, की आम्हाला रानभाज्या खायच्या तर त्या कोठे मिळणार? यासाठीही रानभाज्यांची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे.

शेतात अपोआप उगवणाऱ्या रानभाज्यांविषयी आधी पाहू. रानभाज्या लावण्यासाठी कुणीही बियाणे पेरले नव्हते की खत दिले नव्हते, तरीही तजेलदार झुडपे शेतात फोफावलेली दिसतात. या नको असलेल्या म्हणजेच तण म्हणून शेतीसाठी ‘कुप्रसिद्ध’ असलेल्या वनस्पतींमध्ये ज्यांची भाजी केली जाते अशा अनेक वनस्पती असतात. निंदनी करण्यासाठी आलेल्या महिला हमखास अशा भाज्या राखून ठेवतात. त्याचे शेंडे त्या भाजीसाठी काढून घेतात व झुडूप तसेच सोडतात. म्हणजे पुन्हा ती भाजी मिळेल. यात अतिशय चविष्ट असणारी रानभाजी तांदुळजा, माठ, पाथरी, घोळ, सराटे, टाकळा या असतात.

तांदुळजा ः अतिशय चवदार असणारी ही भाजी. शेतात ती आपोआपच उगवते. नत्राचे प्रमाण जास्त असले की त्या शेतात ती आढळतेच. ही भाजी शिजवताना तिला उकडून त्याचे पाणी पिळून काढलेच जाते. नंतर ती कांद्यावर तेलात परतवतात.

टाकळा ः याला काही भागांत तरोटा तर काही भागात सोनारू असेही म्हणतात. पहिला पाऊस पडला की छोटी-छोटी टाकळ्याची रोपे जमिनीवर दिसू लागतात. मेथीच्या पानासारखी याची पाने गोलाकार असतात. ही अगदी कोवळी असतानाच त्याची भाजी करावी लागते. ही भाजी उत्तम कृमिनाशक आहे. त्यामुळे पोटाच्या आरोग्यासाठी चांगली. शिवाय आजपर्यंत जितक्या पालेभाज्या मी खाल्ल्या असतील, त्यात सर्वात चविष्ट भाजी म्हणजे टाकळ्याची.

आघाडा ः अमारंथ या समृद्ध व पौष्टिक कुळातील असणारा आघाडा आपल्या आजूबाजूला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवतो. गणपतीच्या पूजेसाठी जी काही ‘पत्री’ लागते त्यात हा हवाच हवा. एरवी तशी दुर्लक्षित असणारी ही वनस्पती पण याची पाने कोवळी असताना चविष्ट भाजी होते.

हिरवा (ढवळा) माठ/रानमाठ/काटेमाठ ः माठाची भाजी ही मानवी समूहाला मिळालेले निसर्गाचे खूप मोठे वरदान आहे. कोरडा प्रदेश असू देत की पावसाचा पट्टा, लाल मुरमाट जमीन असू दे की काळी माती; माठ सगळीकडेच आढळतो. थोडेसे पावसाचे पाणी याला वाढण्यास पुरेसे असते.

माठाचे अनेक प्रकार आहेत. सगळ्यांचीच भाजी एकदम चवदार होते. याची पाने, खोड, फुल आणि बियाही खाल्ली जातात. त्यांत पोषणमूल्य खूप असते. या झाडांवर कधी रोग पडलेले मला आढळले नाही. माठ हा पालेभाजीचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे.

घोळ ः यामध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. एक मोठी घोळ आणि दुसरी छोटी घोळ. दोन्हीही खाद्य आहेत. शेतात भरपूर उगवताच. याची नुसती काडी जरी तोडून लावली तरी लगेच मूळ धरून रुजते. अगदी कुंडीतसुद्धा पुरेशी भाजी मिळते. गुणाने थंड असणारी ही भाजी उन्हाळ्यात खाल्ली तर जास्त चांगली. वर्षभर उपलब्ध असते.

पाथरी ः शक्यतो उतारावर किंवा मुरमाट माती असणाऱ्या शेतात, मोकळ्या जागेत पाथरी येते. पावसाच्या सुरुवातीपासून उगवायला सुरुवात होते. ती शेतांत वर्षभर आढळते. पाथरीची पाने कोवळी असताना भाजी केली जाते. उष्णता विकार असणाऱ्यांसाठी विशेषतः उन्हाळी लागली असता उत्तम भाजी आहे.

गाय-गुरे जेव्हा आजारी पडून कोणताच चारा खात नाही अशा वेळी पाथरीला मात्र जरूर खातात; म्हणून काही शेतकरी ही भाजी शेतात राखून ठेवतात.

चीलु, चंदन बटवा, पोकळा, कुंजीर या अशा काही अजून तण म्हणून शेतात असणाऱ्या भाज्या. उत्तम चवीच्या आणि पौष्टिक. या भाज्या शेतकऱ्याला उपजीविकादेखील मिळवून देऊ शकतात. तशा या भाज्या खेडेगावातील किंवा छोट्या शहरातील आठवडे बाजारातून विकल्या जातातच. त्याचे चांगले उत्पन्नदेखील शेतकऱ्याला मिळते.

शेतातून आपण जंगलाकडे गेलो तर ही भाज्यांची विविधता जास्तच वाढत जाते. यात अळंबीपासून तर छोट्या झुडपापर्यंत खूप भाज्या आढळतात. जंगलात येणाऱ्या भाज्यांमध्ये चाई, भारंगी, कैली, बडदा, लुती, शेवळ या मुख्य भाज्या. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो. पण या भाज्या खाण्याची पद्धत माहीत असणे देखील महत्वाचे असते. नाही तर नको त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येईल. एकदा महाविद्यालयातील मुले जंगलात फिरायला गेले होते. त्यात एका मुलाला बडदा खातात हे माहीत होते. त्याने तो कंद काढून लगेचच खायला सुरुवात केली. आणि जे नको ते सर्व झाले व त्याला त्वरित इस्पितळात हलवावे लागले. बडदा खातात हे त्याला माहीत होते, पण कोणती प्रक्रिया करून खातात, त्याची मात्र त्याला पूर्ण माहिती नव्हती. बडदा हा प्रचंड खाजरा देखील असतो. त्याची भाजी करण्यासाठी बोंडारा किंवा आंबटवेल याची पाने त्यात घालावे लागतात. त्याने त्याचा खाजरेपणा कमी होतो आणि त्यातील अनावश्यक घटक नष्ट होऊन खाण्यास उपयुक्त होतात. अशी ही बडद्याची भाजी खूप भारी लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला झुडपे कोवळी असतानाच याची भाजी होते.

शेतातून आपण जंगलाकडे गेलो तर ही भाज्यांची विविधता जास्तच वाढत जाते. यात अळंबीपासून तर छोट्या झुडपापर्यंत खूप भाज्या आढळतात. जंगलात येणाऱ्या भाज्यांमध्ये चाई, भारंगी, कैली, बडदा, लुती, शेवळ या मुख्य भाज्या. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो. पण या भाज्या खाण्याची पद्धत माहीत असणे देखील महत्वाचे असते. नाही तर नको त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येईल. एकदा महाविद्यालयातील मुले जंगलात फिरायला गेले होते. त्यात एका मुलाला बडदा खातात हे माहीत होते. त्याने तो कंद काढून लगेचच खायला सुरुवात केली. आणि जे नको ते सर्व झाले व त्याला त्वरित इस्पितळात हलवावे लागले. बडदा खातात हे त्याला माहीत होते, पण कोणती प्रक्रिया करून खातात, त्याची मात्र त्याला पूर्ण माहिती नव्हती. बडदा हा प्रचंड खाजरा देखील असतो. त्याची भाजी करण्यासाठी बोंडारा किंवा आंबटवेल याची पाने त्यात घालावे लागतात. त्याने त्याचा खाजरेपणा कमी होतो आणि त्यातील अनावश्यक घटक नष्ट होऊन खाण्यास उपयुक्त होतात. अशी ही बडद्याची भाजी खूप भारी लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला झुडपे कोवळी असतानाच याची भाजी होते.

शेवळ हीदेखील याच कुळातील एक वनस्पती. जमिनीतून वर येताना याची पाने येण्याआधीच फूल बाहेर येते. मोठा दांडा आणि त्यावर अतिशय आकर्षक रंगाचे हे फूल खूप देखणे दिसते. याच फुलांची दांड्यासह भाजी केली जाते. ती करण्याची पद्धतही खूप विशेष आहे. म्हणजे या दिवसात असलेले काकड फळे यात घालावे लागते तेव्हा ते खाण्यायोग्य होते. पण इथे हे लक्षात घ्यायला हवे, की अशा भाज्या कधी काढायच्या, याचेही एक ज्ञान असते. ते समजून घेणे खूप आवश्यक आहे.

ई-मेल – ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT