Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात पारंपरिक फळपिकाऐवजी शेतकरी अव्हॅकॅडो, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी नवीन फळपिकांची स्वयंप्रेरणेने लागवड करत आहेत. अशा नावीन्यपूर्ण फळ पिकांची लागवड करणाऱ्यांना दिशा देण्यासाठी विद्यापीठामार्फत या नवीन पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत शिफारस देण्याची सूचना कृषी विभागाकडून कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसमोर कऱण्यात आली.
विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीची मंगळवारी (ता.१७) बैठक पार पडली. या बैठकीत ही सूचना करण्यात आली. या सूचनेशिवाय शेतकरी चार फूट अंतरावरील ठिबकवर जोड ओळ पद्धतीने लागवड करत आहेत. तरी ठिबक सिंचनाद्वारे द्यायच्या खतांची शिफारस मिळण्याची मागणीही करण्यात आली.
जैविक निविष्ठासाठी जिल्ह्यात असलेल्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आउटलेट उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना सोयीचे होईल अशीही सूचना करण्यात आली. बायोचार पद्धतीही शेतकऱ्यांमध्ये प्रचलीत होण्यासाठी एसओपी क्षेत्रीय कर्मचारी यांना तयार करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. मक्याचे बियाणे हे हायब्रीड असल्याकारणाने दरवर्षी बियाणे खरेदी करावे लागते. तसेच मका बियाणे उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या वाणाची टंचाई निर्माण करून दर वाढ करत आहे.
त्यासाठी हायब्रीड वाणाप्रमाणे उत्पादन देणाऱ्या सरळ वाणाचा मका पिकामध्ये विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची अधिक बचत होईल. तसेच कृषी विद्यापीठाने देशी कपाशीचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित व प्रसारित करावे अशी सूचनाही बैठकीत कऱण्यात आली.
कोरडवाहू जमिनीत जास्त कापसाचे उत्पादन कसे मिळेल, याकरिता मार्गदर्शन करावे. जिनिंगमध्ये स्पिनिंगसाठी लागणाऱ्या लॉग स्टेपल व एक्स्ट्रॉ लॉग स्टेपलच्या सुधारित जीएम वानावर विद्यापीठात संशोधनास मान्यता द्यावी.
तसेच प्रोसेसिंगमध्ये फक्त रुई काढणे हा उद्देश नसून सरकीपासून प्रोटिन सुद्धा तयार करण्याबाबत विद्यापीठात संशोधन करण्याचे सुचविण्यात आले.खजूर लागवडीसाठी रोपांची उपलब्धतेबाबत व लागवड तंत्रज्ञानाबाबत संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली . सोयाबीन मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. या पिकामध्ये लागवडीपेक्षा काढणीचा खर्च जास्त येतो. शेतकऱ्यांना सहज वापरण्या जोगे काढणी यंत्र उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा कृषी विभागांकडून व्यक्त करण्यात आली.
बालानगर सीताफळाची वाढावी टिकवण क्षमता
सीताफळाच्या बालानगर वाणाची टिकवण क्षमता केवळ ३६ तास आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्केटमध्ये विक्री करणे शक्य होत नाही, त्यामुळे प्रक्रिया शिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. त्यासाठी गोल्डन वाण प्रमाणे किमान सात दिवसाचे सेल्फ लाइफ वाढवताना साखर व चवीचे प्रमाण बालानगर प्रमाणे असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारचे वाण विकसित झाल्यास मोठ्या प्रमाणावर सीताफळाच्या बागा ज्या सध्या तोडल्या जात आहेत त्याला आळा बसेल. शिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल असेही कृषी विभागाकडून शास्त्रज्ञासमोर मांडण्यात आले.याशिवाय पेरू तसेच सीताफळ पक्वता कालावधीमध्ये हवामान बदल झाल्यास मोठ्या प्रमाणावर अवेळी फळे पिकून गळतात. त्यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होते. यासाठी प्रतिकूल हवामानात टिकून राहणारे वाणाचा विकसित करण्याची सूचनाही बैठकीत केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.