Mumbai News: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत महाराष्ट्र जनसुराक्षा विधेयक संमत झाल्याने कायद्याचा मार्ग सुकर झाला आहे. विधानसभेत किरकोळ विरोध, तर विधान परिषदेत ठाकरे गटाने कडवा विरोध करत ‘नक्षलवाद संपला आहे, तर हे विधेयक नेमके कुणासाठी?’ असा प्रश्न विचारला. या विधेयकामागे केवळ राजकीय हेतू स्पष्ट दिसत असल्याचे सांगत विधेयकाला विरोध केला. तसेच काँग्रेसकडूनही विधेयकाला विरोध केला.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी जनसुरक्षा विधेयक मंजूर केले. ‘हा सत्तेचा दुरुपयोग असून सरकारच्या कथनी आणि करणीत फरक आहे,’ अशा शब्दात विरोधकांनी टीका केली.
‘एकीकडे नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करायचा असे सांगितले जाते. परंतु जनसुरक्षा विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद हा शब्द नाही. आता तर नक्षलवाद संपत आला मग जनसुरक्षा कायदा कोणासाठी,’ अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडण्याआधी संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला होता.
‘‘देशविघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत. मात्र हे विधेयक कुठलाही शेंडा-बूड नसलेले असून, यामध्ये ‘बेकायदा कृत्य’ याची स्पष्ट व्याख्या नाही. केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा आणत आहात का,’’ असा सवालही ठाकरे यांनी केला.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘जनसुरक्षा कायद्यात कडव्या डाव्या संघटनांनांवर कारवाई प्रस्तावित आहे. ही कारवाई व्यक्तींवर केली जाणार नाही,’’ असे स्पष्टीकरण दिल्यानंतर विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडले. या विधेयकास विरोध करत विरोधकांनी गोंधळ घातल्याने १० मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. या विधेयकाला अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहीर, अभिजित वंजारी यांच्यासह अन्य सदस्यांनी कडाडून विरोध केला. देशात यूएपीए, एमपीडीए सह चार कायदे असताना या कायद्याची गरज काय, असा सवाल केला.
तर प्रसाद लाड यांनी विधेयकाच्या बाजूने मत मांडताना बाळासाहेब ठाकरे यांनी डावी विचारसरणी मारूनच शिवसेना बनविली, असा उल्लेख केल्याने अनिल परब यांच्यासह अन्य आमदार आक्रमक झाले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. मात्र, त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अधिक चर्चा न करता हे विधेयक सभापती राम शिंदे यांनी थेट मतास टाकले. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
काँग्रेसचा विरोध
विधान परिषदेत काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. या विधेयकावर १२ हजारांपेक्षा जास्त सूचना व आक्षेपांवर जनसुनावणी झाली नसल्याचा आरोप अभिजित वंजारी यांनी केला. तर या विधेयकाबाबत विरोधकांच्या मनात शंका आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
‘त्या ६४ संघटनांवर बंदी घाला’
‘‘पहलगामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. सरकार अजून त्यांचा शोध घेत आहे. त्यांना अजूनही पकडण्यात आलेले नाही. खरंतर दहशतवादी किंवा नक्षलवाद्याची जात-पात, धर्म न विचारता कारवाई करायला हवी. कायद्यात त्या अनुषंगाने सुधारणा करा, आम्ही न विचारता पाठिंबा देतो,’’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान, देशविघात कृत्य करणाऱ्या ६४ संघटनांची नावे जाहीर करून त्यांच्यावर बंदी घाला, असे आव्हान त्यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.