मनीष देशपांडे
संसद जरी सर्वोच्च व सर्वशक्तिमान असली तरी संविधानातील मूलभूत संरचनेमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यांनी केलेल्या कोणत्याही कायद्याचा न्यायिक पुनरवलोकनाचा अधिकार हा न्यायालयाकडे कायम असेल असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. २४ एप्रिल १९७३ रोजी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यामध्ये दिलेला हा निकाल आजतागायत देशासाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या ‘उद्देशिका’मधील राज्यघटनेची ही मूलभूत तत्त्वे आणि मूल्यांचा प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नागरिकांना राज्यघटनेच्या मूल्यांची जाणीव व्हावी, त्यांचा त्यावरील विश्वास वाढावा या उद्देशाने २६ नोव्हेंबर २०२४ पासून ते २६ नोव्हेंबर २०२५ या वर्षामध्ये ‘राज्यघटना अमृत महोत्सव - घर घर राज्यघटना’ कार्यक्रम साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने आदेश दिले. ही राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे आणि मूल्ये सर्वांना समजतील अशा सोप्या तक्त्यांच्या स्वरूपामध्ये दिली आहेत.
त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थही दिलेला आहे. यामध्ये उद्देशिकाचे पाच भाग केले असून, ‘पहिला भाग’ आम्ही भारताचे लोक, ‘दुसरा भाग’ भारत कसा घडवावा? ‘तिसरा भाग’ भारतीय नागरिकांना काय मिळणार? ‘चौथा भाग’ भारतीय नागरिकांची जबाबदारी काय? आणि ‘पाचवा भाग’ सरकारची जबाबदारी काय? असे विभाजन केले आहे. या भागामध्ये अंतर्गत असणारे सर्व उपविभागांचेही विश्लेषण करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेस काही जण प्रास्ताविका म्हणतात तर काही जण सरनामा म्हणतात. आपल्याला भारतीय राज्यघटना व तिची मूलभूत तत्त्वे जाणून घेण्यासाठी ही उद्देशिका महत्त्वाची ठरते. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यातीत तत्त्वे, हक्क आणि जबाबदारी यांचा समावेश करणे शक्य होईल. सामान्यातील सामान्य लोकांपर्यंत ही उद्देशिका पोहोचविण्यासाठी संविधान प्रचारक लोकचळवळ व एस.एम.एस.सी. फाउंडेशन (सोशल मूव्हमेंट सपोर्ट सेंटर) प्रयत्नशील आहे.
उद्देशिकेचा नेमका अर्थ सांगणारा आणि माफक किमतीत उपलब्ध होईल, असा तक्ता तयार करण्याची संकल्पना पुढे आली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतार्थ शेवगावकर व मी (मनीष देशपांडे) यांनी पुढाकार घेतला. सुनीती सु. र., रोहिणी पेठे, सिद्धेश रत्नमाला मदन, ॲड. नीलेश खानविलकर, नागेश जाधव, प्रवीण जठार, ॲड. तृणाल टोणपे, ॲड. निकिता आनंदाचे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या तक्त्यासाठी वुई दी पीपल अभियान संस्थेचे बुकलेट व ‘जगण्याचा मार्ग ः संविधान उद्देशिका’ या पुस्तकातून संदर्भ घेण्यात आले आहेत. त्याच्या प्रकाशनासाठी साहित्य विश्व प्रकाशनचे संपादक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांच्या प्रयत्नातून निर्मित हा उद्देशिका तक्ता सर्वांना उपयोगी ठरेल. त्यामुळे सर्व संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष कार्यालये व संविधान प्रेमी या सर्वांनी या तक्त्यांचा वापर नक्की करावा. तो सतत आपल्या डोळ्यासमोर राहावा, यासाठी दर्शनी भागात लावावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.