Farmer CIBIL News : ‘‘शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी,’’ असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.९) येथे दिले.
अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, आमदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘काही बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्जखात्यात टाकल्यास त्यावर तत्काळ कारवाई व्हावी. जलयुक्त शिवार योजनेचे काम मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवावी. वादळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल.’’
‘...तर विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा’
‘‘विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात टाळाटाळ करीत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात नियोजनानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकूण वाहितीखालील क्षेत्र ७.८१ लाख हेक्टर आहे. खरीप क्षेत्र ६.८१ लाख हेक्टर आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.