Parbhani News : जिल्ह्यातील पालम तालुक्यातील बनवस आणि पारवा या गावासह जिल्ह्यातील सुमारे ३० टक्के शेतकरी २०२१ च्या खरीप हंगामात रिलायन्स जनरल विमा कंपनीने मंजूर पीकविमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत.
संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची रक्कम जमा करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा पीकविमा योजनेचे जिल्हास्तरीय समितीचे सचिव यांच्याकडे केली आहे.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने परभणी जिल्ह्यातील २०२१ खरीप हंगामातील सोयाबीनचा प्रलंबित सुमारे २२० कोटी रुपयाचा पीकविमा परतावा यंदाच्या २७ ऑगस्टपासून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे.
परंतु पीकविमा मंजूर झालेल्या प्रत्येक गावातील किमान ३० टक्के शेतकरी या विमा परताव्यापासून अद्याप वंचित आहेत. त्याबाबतीच आकडेवारी विमा कंपनीने कृषी विभाग तसेच इतरांकडे सादर केलेली नाही. यासंदर्भात सातत्याने मागणी करूनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीकविमा परताव्याची आकडेवारी उपलब्ध करुन दिली जात नाही.
प्रलंबित विमा परताव्याची एकूण रक्कम, लाभार्थी शेतकरी, वाटप रक्कम याबाबतची आकेडवारी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. अन्यथा, कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा डॉ. सुभाष कदम, चंद्रशेखर लांडगे, मल्लिकार्जुन लांडगे, संतोष कऱ्हाळे, विठ्ठल कऱ्हाळे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.