MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Soybean MSP : सोयाबीन खरेदीसाठी बारदानाच (पोते) नसल्याची बाब समोर आली असून, या आठवड्यात बारदाना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

Dharashiv News : सरकारने यंदा सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी आधारभूत केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर १५ ऑक्टोबरपासून सोयाबीनची खरेदी करण्याचे नियोजन होते. मात्र एका केंद्रावरील ८७ क्विंटल खरेदीचा अपवाद सोडला, तर जिल्ह्यातील १७ केंद्रावर अजून खरेदीला सुरुवात झालेली नाही.

सोयाबीन खरेदीसाठी बारदानाच (पोते) नसल्याची बाब समोर आली असून, या आठवड्यात बारदाना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे सोयाबीनमध्ये मॉइश्‍चरचे (आर्द्रता) प्रमाण जास्त असल्याने खरेदी थंडावल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी नाफेडच्या वतीने विविध संस्थांच्या माध्यमातून १६ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ई-समृद्धी पोर्टलवरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, काही ठिकाणी या नोंदणीसाठीही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

गेल्या वर्षी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी त्याच आधार क्रमांकावरून नोंदणी होत नसल्याचे चित्र आहे. या शेतकऱ्यांना केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. दुसरीकडे १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे नियोजन असताना अद्याप खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यातील केवळ कानेगाव केंद्रावर आतापर्यंत ८७ क्विंटल खरेदी झाल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपायी यांनी दिली.

तर काही केंद्रांवर खरेदीसाठी बारदानाच नसल्याचे सांगितले जात आहे. जुना बारदाना केंद्रांना वाटप केला असला तरी तो पुरेसा नाही. बारा टक्के मॉइश्‍चर असल्यास केंद्रावर सोयाबीन खरेदी केली जात आहे. सध्या मॉइश्‍चरचे प्रमाण साडेतेरा ते साडेचौदा टक्के आहे. यामुळे मॉइश्‍चरमुळेही खरेदी केली जात नाही.

जिल्ह्यातील केंद्रासाठी अडील लाख बारदान्याची ऑर्डर दिली असून, तो लवकरच कोलकत्यावरून येणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी केली जाणार असून, नोंदणी व खरेदीसाठी अजून मोठा कालावधी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी कमी भावात बाजारात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही श्री. बाजपायी यांनी केले आहे.

लातूरलाही केवळ १६५ क्विंटल खरेदी

लातूर जिल्ह्यात चौदा केंद्रावर सोयाबीनची खरेदी करण्यात येत असून, या सर्व केंद्रांकडे मिळून ५० हजार जुना बारदाना शिल्लक आहे. नवीन बारदानाची ऑर्डर दिली असून आतापर्यंत लातूर येथील केवळ एकाच केंद्रावर १६५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दिली. सोयाबीनमध्ये मॉइश्‍चरचे प्रमाण जास्त असल्याने खरेदी थंड असल्याचे सोमारे यांनी सांगितले. नवीन बारदाना येईपर्यंत मॉइश्‍चरचे प्रमाण कमी होऊन केंद्रावर सोयाबीन खरेदीला जोमाने सुरू होण्याची आशा सर्वांना आहे.

मॉइश्‍चरच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

अडत बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून, शेतकरी तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. मागील दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांना भाववाढीचा आशा उरली नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मॉइश्‍चर व हवेच्या नावाखाली बाजारात शेतकऱ्यांची लूट होत असून, हमीभाव चार हजार ८९२ रुपये असताना कमाल साडेचार तर किमान तीन तीनशे रुपये क्विंटल भाव दिला जात आहे. आवक वाढताच सोयाबीनचे भाव घसरले असून हवा, कडती, मातरे आदींमुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र बाजारात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

Crop Damage : कळंबामध्ये भात, सोयाबीन वाचविण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT