Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या मदतीला फुटले पाय

Crop Damage : अपात्र असलेल्यांच्याही खात्यात निधी जमा; ‘उठाबा’ शिवसेनेची तक्रार

Team Agrowon

Buldana News: नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना, नागरिकांना शासनाकडून मदत दिली जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षात आलेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची मदत अनेक अपात्र व्यक्तींच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण आजवर गोपनीय पद्धतीने हाताळले जात होते. मात्र आता उद्धव ठाकरे शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून दोषी कर्मचारी, दलालांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

निधी लाटणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे नोटीस बजावत निधी तातडीने सरकार जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील या प्रकाराने जिल्हाभरात खळबळ उडवून दिली आहे.

२०२३ मध्ये जुलै महिन्यात जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची, पीक नुकसानाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून जमा करण्यात आली आहे. घरांचे नुकसान, जमीन खरडून गेलेल्यांना ही मदत करण्यात आली.

या नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीने न झाल्याने अपात्र व्यक्तींची नावे लाभार्थ्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोप सातत्याने झाला होता. नैसर्गिक आपत्तीनंतर महसूल, ग्रामीण व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी पंचनामे केले होते. लाभार्थ्यांची अंतिम माहिती शासनाकडे पाठवताना अपात्र व्यक्तींची नावे कुणी यादीत समाविष्ट केली, या बाबत शोध घेण्याची गरज आहे.

संगनमताने प्रकार

नुकसान झालेले नसतानाही संबंधितांना हाताशी धरून यंत्रणेतील काही जणांनी ही मदत मिळवून दिल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे. एरवी शेतकऱ्यांना हजार-दोन हजारांची मदत मिळवायची असेल तर यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागतात.

असे असताना कुठलेही नुकसान न होता संबंधितांच्या खात्यात हजारोंची मदत कुठल्या आधारे वळती केल्या गेली, या बाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. महसूल यंत्रणेने हे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे सांगितले जात असून, ज्या अपात्र व्यक्तींच्या खात्यात निधी वळती झाला त्यांची खाती तातडीने बँकांना होल्ड करण्यास सांगण्यात आलेले आहे. शिवाय संबंधित व्यक्तींना शासनाचा निधी परत देण्याबाबत नोटीसही बजावण्यात आल्याचे निर्देश दिले आहेत.

निधी भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जळगाव जामोद तहसीलअंतर्गत शेती नसतानाही ७० लाभार्थी दाखवत शेती तयार करून शासनाची अंदाजे ५५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक करणारे संबंधित कर्मचारी व दलालांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या तालुक्यातील काही तलाठी व तहसीलमधील कर्मचाऱ्याने दलालांमार्फत शेती नसतानाही खोटी कागदपत्रे तयार करून अर्ज भरले. शेती खरडून गेल्याच्या नुकसानीचा लाभ दिला आहे. हा प्रकार अंगलट येण्याची चिन्हे दिसत असल्याने आता शासनाने ७२ जणांना नोटीस दिली आहे.

शिवाय जळगाव तहसीलअंतर्गत अशा प्रकारचा तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय तक्रारदार तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी मंगळवारी (ता. २३) मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT