Sangamner Nilwande Dam : संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. कालव्यातून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे पाइप फोडल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाइप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलिस बळाचा वापर करून धाक निर्माण केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
रविवारी (ता. ४) निमगाव बुद्रूक येथे शेतकरी व प्रशासन समोरासमोर आले. या वेळी पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या होत्या.उन्हाळा तीव्र झाल्यामुळे शेतीसाठी आणि वापरासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यात चाऱ्यांची कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पाइप फोडून टाकले होते. त्या विरोधात भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यासह ५०० शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. अखेर जलसंपदा विभागाने लेखी देऊन पाइप फोडणार नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जलसंपदा विभागाने आपला शब्द फिरवला आहे. आज पोलिस बळासह जलसंपदा विभागाचे अधिकारी निमगाव बुद्रूक येथे दाखल झाले.
शेतकऱ्यांचाही मोठा जमाव याठिकाणी जमला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. राहुरी तालुक्यात कालव्यांचे क्षेत्र १६ किलोमीटर आहे. त्या १६ किलोमीटरसाठी तुम्ही वीस दिवस पाणी देणार आहात तर संगमनेर तालुक्यात तिप्पट म्हणजे ४८ किलोमीटरचे क्षेत्र आहे त्याला तुम्ही साठ दिवस पाणी देणार आहात का? त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही वीस दिवस पाणी देऊ असे सांगितले. त्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला.
निळवंडे धरण आणि कालवे व्हावे यासाठी संगमनेर तालुक्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जनतेने पुढाकार घेतला. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला. त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क असताना, आमच्या सोबतच हा अन्याय तुम्ही नेमका कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? असाही परखड सवाल रविवारी (ता. ४) शेतकऱ्यांनी विचारला आहे.
शासनाने आमचा अंत पाहू नये. पाणी काढणे ही कठीण प्रक्रिया आहे. एका पाइपमध्ये पाणी भरायला चार तास लागतात. त्यात पाणी कमी झाले की पुन्हा पुन्हा भरावे लागते. जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकदा फिल्डवर या, आमचा हक्क तुम्ही डावलणार असाल, तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ.
- अरुण गुंजाळ, उपसरपंच, निमज
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.